म. टा. प्रतिनिधी, नागपूर
मिहानमध्ये २३४ एकरावर उभ्या होणाऱ्या फूड पार्कला कायदेशीर कामांमुळे विलंब झाला, असे स्पष्टीकरण पतंजली समूहाचे रामदेव बाबा यांनी मंगळवारी नागपुरात दिले. वितरकांच्या बैठकीसाठी मंगळवारी नागपुरात आले असता ‘मटा’ ने दिलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रामदेव बाबा यांनी हे स्पष्टीकरण दिले.
पतंजली समूहाला फूड पार्कसाठी अत्यल्प दराने जमीन देण्याला एक वर्ष पूर्ण झाले. दीड वर्षात प्रकल्पातून उत्पादन करण्यासह दहा हजार शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व वर्षाला १०० कोटी रुपयांचा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याच्या अटीवर पतंजलीला स्वस्त दरात ही जमीन देण्यात आली आहे. तसे असताना वर्षभरात केवळ खड्डे आणि संरक्षक भिंतच उभी करण्यात आल्याचा मुद्दा ‘मटा’ने मंगळवारी मांडला होता. त्यावरून रामदेव बाबा यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, ‘मिहानमधील प्रकल्पाला विलंब झाला आहे. मात्र हा विलंब कायदेशीर कारणाने झाला आहे.
या प्रकल्पात खाद्यान्न प्रक्रिया केंद्रदेखील सुरू होत आहेत. त्यामध्ये पुढील वर्षीपासून प्रक्रिया सुरू होईल. मात्र सध्या या प्रकल्पाच्या कामाला कायदेशीर कारणाने विलंब झाला’, असेही ते म्हणाले.
एकीकडे रामदेव बाबांनी कायदेशीर कारणे सांगितली असल्याने नेमक्या कुठल्या कारणाने विलंब झाला, हे जाणून घेण्यासाठी ‘मटा’ने मिहानला विकसित करणाऱ्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी (एमएडीसी) चर्चा केली. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी मात्र, असा विलंब एमएडीसीकडून झाल्याचे फेटाळून लावले. ‘पतंजलीने भूमिपूजनाच्या दिवशीच मिहानमधील जमिनीचे सर्व पैसे भरले. तसेच ज्या दिवशी त्यांनी हे पैसे भरले त्या दिवशी
त्यांना २३४ एकर एमएडीसीकडून हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे एमएडीसीकडून तरी कुठलाच कायदेशीर विलंब झालेला नाही. पतंजलीलाच हा फूड पार्क असल्याने घनकचरा व्यवस्थापन, खाद्यान्न प्रक्रिया, खाद्यनिर्मिती अशा विविध प्रकल्पांसाठी अन्न व औषधे प्रशासनासह अन्य मंजुऱ्या घेण्यास विलंब झाला असेल. पण, एमएडीसीकडून सर्व प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थित पार पडल्या’, असे त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.
--राज्यातून एक हजार कोटीचा माल
पतंजली समूहाकडून ‘फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ अर्थात एफएमसीजी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादनांची निर्मिती होते. ही उत्पादने प्रामुख्याने हरिद्वार येथील योगपीठ परिसरातील कारखान्यात तयार होतात. तर काही उत्पादने कंपनी ‘आउटसोर्स’देखील करते. मात्र बहुतांश खाद्यान्न हे हरिद्वारला तयार होतात. त्यासाठी देशभरातून कच्चा माल खरेदी केला जातो. असा १ हजार कोटी रुपयांचा कच्चा माल पतंजलीकडून नागपुरातून घेतला जात आहे. त्यामध्ये मोसंबींचा समावेश अधिक आहे. येत्या काळात हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत नेला जाईल, अशी माहितीही रामदेव बाबा यांनी दिली.
--योगगुरुंची ‘बिझनेस मीटिंग’
कुठल्याही कंपनीचे प्रमुख आपल्या वितरकांशी चर्चा करण्यासाठी शहरात येत असताना त्यांची ती ‘बिझनेस मीटिंंग’ समजली जाते व त्यानिमित्ताने शहरात येत असल्यास ती ‘बिझनेस व्हीझिट’ मानली जाते. रामदेव बाबा मात्र योग गुरू आहेत. पण, पतंजली फूड प्रोडक्ट्सच्या निमित्ताने ते ‘बिझनेसमन’देखील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पतंजली उत्पादनांच्या विदर्भभरातील वितरकांशी महाल येथील रजवाडा पॅलेस येथे चर्चा केली. मुख्य म्हणजे ही चर्चा एखाद्या मोठ्या उद्योग समूहाप्रमाणे बंदद्वार होती. अगदी योग शिक्षकांनादेखील तेथे परवानगी नव्हती. त्यामध्ये प्रामुख्याने पतंजली उत्पादनांच्या सध्या काही प्रमाणात घट झालेल्या विक्रीबाबत गंभीर चर्चा झाली. याच बैठकीत रामदेव बाबा यांनी मिहानमधील फूड पार्कचादेखील आढावा घेतला. फूड पार्क येथे आल्यास उत्पादन विक्री कशी वाढू शकेल, याबाबत त्यांनी चर्चा केली. अशाप्रकारे योग गुरू असलेल्या रामदेव बाबांची ही ‘बिझनेस व्हीझिट’ ठरली. येथून ते पुण्याला रवाना झाले. तेथेदेखील वितरकांशी संवाद साधणार आहेत.