म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
वेगळ्या विदर्भासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने येत्या ११ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘विदर्भ बंद’ला समर्थन जाहीर करून यात सक्रिय सहभागी होण्याचा शब्द भंडारा-गोंदियाचे भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी दिला. भाजपच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊनही विदर्भाला गाजर दाखवण्याचे काम नेते मंडळी करत असल्याची तोफही त्यांनी डागली.
मानेवाडा रोड येथे समितीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन खासदार पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी स्वतः आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले. यावेळी समितीचे नेते वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले,
डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती प्रामुख्याने उपस्थित होते.
गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याने वेगळे राज्य सहज शक्य आहे. संसदेत अशासकीय विधेयकाद्वारे विदर्भाचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे विधेयक सभागृहात येऊच दिले नाही. विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनापासून भाजप नेते पळ काढत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विदर्भ आणि शेतकऱ्यांवर बोलू दिले जात नाही आणि बोलल्यास बंडखोर ठरवतात, अशी खंतही व्यक्त करून, अंगणवाडी सेविकांचे वेतन देण्यासाठी पैसे नसलेल्या महाराष्ट्रात राहून विदर्भ कसा सक्षम होईल, असा सवाल पटोले यांनी केला.
अभी नही तो कभी नही, असा हा लढा आहे. यात सर्व विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चटप यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील नेते एकत्र येऊन अखंड महाराष्ट्राचा ठराव आणू शकतात
तर, विदर्भाचे नेते वेगळ्या राज्यासाठी एकत्र का येत नाही, असा सवाल राम नेवले यांनी केला. यावेळी विदर्भ माझाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, जिल्हाध्यक्ष अरुण केदार, माजी आमदार उपेंद्र शेंडे, महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रमुख अॅड. अर्चना नंदघले, पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना मामर्डे, शहर प्रमुख विजया धोटे, राष्ट्रवादीचे शब्बीर अहमद विद्रोही यांचेही भाषणे झालीत. व्यासपीठावर अरविंद
देशमुख, मुकेश मासूरकर, मंगलमूर्ती सोनकुसळे, श्याम वाघ, अंकुश भोवते, सुनील चोखारे, राजाभाऊ टांकसाळे, अब्दुल अजीज ख्वाजा, इंद्रजीत आमगावकर, भय्यालाल माकडे आदी उपस्थित होते.