अ‍ॅपशहर

नक्शे पर से नाम मिटा दो... नागपुरात दाटला पाकक्षोभ

उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध असलेली चीड नागपूरकरांनीदेखील दाखवून दिली. शहरभर ‘नक्शे पर सें नाम मिटा दो पापी पाकिस्तान का’, अशाप्रकारच्या घोषणा देत पाकिस्तानविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. कुठे झेंडा जाळण्यात आला तर कुठे आदरांजली वाहण्यात आली.

Maharashtra Times 20 Sep 2016, 4:00 am
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur protest against pakistan in nagpur
नक्शे पर से नाम मिटा दो... नागपुरात दाटला पाकक्षोभ


उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध असलेली चीड नागपूरकरांनीदेखील दाखवून दिली. शहरभर ‘नक्शे पर सें नाम मिटा दो पापी पाकिस्तान का’, अशाप्रकारच्या घोषणा देत पाकिस्तानविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. कुठे झेंडा जाळण्यात आला तर कुठे आदरांजली वाहण्यात आली.

उरीतील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांद्वारे त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा निषेध करण्‍यासाठी विविध कार्यक्रम नागपुरात झाले. एकीकडे प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये या संपूर्ण घटनेवर भाषणानंतर आदरांजली वाहण्यात आली. तर शिवसेनेचे पंजू तोतवानी यांनी खामला चौकात जोरदार निदर्शने केली. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चप्पलेचा हार घालण्यात आला. दुसरीकडे उरी हल्ल्यातील शहिदांसाठी नरेंद्रनगरात आदरांजली वाहण्यात आली. यासाठी संजय पौनीकर यांच्या नेतृत्त्वात शांती रॅली काढण्यात आली. तसेच शहिदांसाठी प्रार्थना करण्यात आली.

माजी वायुसैनिकांचा जोश

निवृत्ती आली तरी सैनिक हा सैनिकच असतो. त्याच्यात ज‌ोश कायम असतो, हे माजी वायुसैनिकांनी दाखवून दिले आहे. स्वत:च्या घरी संकट असतानादेखील महाराष्ट्र माजी वायुसै‌निक कल्याण संघटनेने जोशाचा परिचय ‌दिला. अवघ्या काही तासांत माजी वायुसैनिकांनी अजनी चौकात एकत्र येत शहिदांना आदरांजली वाहिली. अशाप्रकारच्या घटना पाहून पुन्हा लष्कारात दाखल होऊन पाकिस्तानला धडा शिकविण्याची इच्छा होत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

सांगा, आम्ही शिरू का आता पाकिस्तानात?

नागपूर : उरीतील हल्ल्यानंतर देशभरात पा‌किस्तानविरोधी वातावरण तयार झाले आहे. यामध्ये नागपुरातील शालेय विद्यार्थीही मागे नाहीत. अगदी पाचवीतील विद्यार्थ्यानेही ‘तुम्ही कारवाई करा... नाहीतर आम्ही पाकिस्तानात शिरतो’, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

उरीतील शहिदांना श्रद्धांजली देण्यासोबतच पाकिस्तानविरोधी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यातच प्रहार मि‌लिटरी स्कूलमध्येदेखील कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष कर्नल (निवृत्त) सुनील देशपांडे यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना या हल्ल्याविषयी मनात जे सुचते, त्या प्रतिक्रिया लिहिण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. काही पाचवीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ‘आपल्याकडे भरपूर शस्त्र आहेत. पण ते काय फक्त पाहण्यासाठी आहेत काय? त्याचा वापर करा. नाहीतर आम्हाला पाकिस्तानात जाऊ द्या’, असे म्हटले आहे. सहाव्या वर्गातील एका विद्यार्थ्याने तर २०१९-२० पर्यंत भारतीय लष्कराच्या ताफ्यात कुठली शस्त्रे असतील, आत्ता कुठली आहेत, याचा लेखाजोखा लिहूनच ‘मोदी काहीच का करीत नाहीत’, अशा भावना मांडल्या.



‘विकास नही अब पाकिस्तान चाहिये’

उरी हल्ल्यावरून एकीकडे देशात पाकिस्तानविरोधी सूर उमटत असताना आता सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘टार्गेट’ ठरत आहेत. ‘मोदीजी, विकास नही अब पाकिस्तान चाहीये’पासून ते ‘मन की बात नही अब गन की बात करो’, असे संदेश फिरत आहेत.

उरी येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघत आहे. ‘पाकिस्तानला धडा शिकवा’, अशी मागणी करणारे अनेक संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.

मोदींना टार्गेट करणारे यापैकी काही संदेश असे, ‘‘मोदी जी गुलाम कश्मीर में सेना को भेजकर करारा जवाब दो, मन की बात नही सिर्फ गन की बात समझता है ये नापाक पड़ोसी’, ‘आता केवळ ट्विटरवर कठोर निंदा नको, पाकिस्तान्यांची प्रेते हवीत आम्हाला’, ‘नही चाहीये विकास या डिजिटल इंडिया, अब चाहिये पुरा पाकिस्तान साफ’, ‘मोदीजी तुमच्याकडून आता हे होणार नाही. देश सेनेला सोपवा मग पहा पाकिस्तानची गंमत’ असे नानाविध संदेश आता दिले जात आहेत.

ट्विटरवर तर काहींनी डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना मोदी व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत, मोदींवर निशाणा साधला. ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असते तर आम्ही लाहोरपर्यंत पोहोचलो असतो’, असे भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी २०१३ मध्ये म्हटले होते. ‘प‌ाकिस्तानबाबत पंतप्रधान आपण अशक्त तर नाहीत ना? याचा पुरावा जनतेला द्या’, असे स्वत: नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ट्विट केल्याची आठवणही काहींनी करून दिली.


सर्व्हे म्हणतो, हल्ला करा!

काही हौशी सोशल मीडिया खातेदारांनी ऑनलाइन सर्वेक्षणही केले. त्यामध्ये ९० टक्क्यांच्यावर ट्विटर हॅण्डलर्सनी ‘पाकिस्तानवर हल्ला करा’, असे सुचवले. तर एका सर्व्हेत ५३ टक्क्यांनी पाकिस्तानवर हल्ला करा, १३ टक्क्यांनी पाकिस्तानशी चर्चा थांबवा व ३५ टक्क्यांनी पीडीपीशी युती तोडून बाकी सर्व करा, असे म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज