म. टा. प्रतिनिधी, नागपूर
कथित माओवादीसमर्थक असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील खटल्यात आता युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी इतर आरोपींविरुद्ध सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून १ डिसेंबर रोजी सरकारी पक्षाचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. या खटल्याची २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
या खटल्याची रोज सुनावणी घेऊन तो लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशांनंतर या खटल्याला वेग प्राप्त झाला. कथित माओवादी हेम मिश्रा याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. दलम कमांडर नर्मदाक्का हिच्याकडे तो संदेश घेऊन जात होता आणि हा संदेश साईबाबांनीच पाठविला होता, असा आरोप पोलिसांनी हेम आणि साईबाबा यांच्यावर केला आहे.
गडचिरोली पोलिसांनी दिल्ली येथून साईबाबा यांना अटक केली होती. साईबाबा यांचा जामीनअर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालविण्याचे आदेश दिले होते. हेम मिश्रा आणि प्रशांत राही यांचे अतिरिक्त बयान ४ नोव्हेंबर रोजी नोंदविण्यात आले. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी साईबाबांचे बयान नोंदविण्यात आले. ८ नोव्हेंबरपासून युक्तिवादाला सुरवात झाली आहे. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील पी. के. सत्यनाथन यांनी आरोपी महेश तिरकी, पांडुरंग आणि हेम मिश्रा या तिघांविरुद्ध युक्तिवाद केला. या तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप हे साक्षीपुराव्यांच्या भरवशावर सिद्ध होत असल्याचा युक्तिवाद अॅड. सत्यनाथन यांनी केला. आता यावर १ डिसेंबर रोजी युक्तिवाद होणार आहे. यावेळी प्रशांत राही आणि साईबाबा यांच्याविरुद्ध युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यानंतर बचावपक्षाचा युक्तिवाद होणार आहे. बचावपक्षातर्फे अॅड. सुरेंद्र गडलिंग बाजू मांडत आहेत.