अ‍ॅपशहर

धोक्याच्या पातळीचा मिळणार ‘एसएमएस’

मुसळधार पावसात अनेक पूल पाण्याखाली जातात. प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुलांवरून प्रवास करणाऱ्यांना यात जीव गमवावा लागतो. यासारख्या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या पुलांवर सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला असून या कामाला सुरुवातही झाली आहे. या यंत्रणेमुळे पाणी पुलावर येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर 'एसएमएस' प्राप्त होणार आहे.

Maharashtra Times 13 Oct 2017, 4:00 am
pravin.lonkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur sms will alert of flood over bridge
धोक्याच्या पातळीचा मिळणार ‘एसएमएस’

Tweet : @pravinlonkarMT
मुसळधार पावसात अनेक पूल पाण्याखाली जातात. प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुलांवरून प्रवास करणाऱ्यांना यात जीव गमवावा लागतो. यासारख्या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या पुलांवर सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला असून या कामाला सुरुवातही झाली आहे. या यंत्रणेमुळे पाणी पुलावर येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर 'एसएमएस' प्राप्त होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच या यंत्रणेचा वापर करीत आहे. आतापर्यंत सात पुलांवर असे सेन्सर बसविण्यात आले आहे. नरखेड तालुक्यातील जाम नदी, वर्धा नदीवरील पुलांवर, सावनेर तालुक्यातील पुलावर, हिंगणा जवळील वेणा नदीवरील पूल, धमगावजवळील वेणा नदीवरील पूल, उमरेड मार्गाजवळील नागनदीवरील पूल, कुही ते वडदा मार्गाजवळील आमनदीवरील पुलांवर आतापर्यंत सेन्सर बसविण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

'रिअल टाइम ब्रिज वॉटर लेवल अलर्ट सिस्टीम' या नावाने ही यंत्रणा काम करणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या यंत्रणेसाठी सोलर पॅनल, बॅटरी, स्मार्ट डिव्हाइस आणि फ्लोट सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. एका यंत्रणेच्या माध्यमातून अनेक पुलांवर लक्ष ठेवता येते. तासाला, दिवसाला, आठवडा, महिना या अंतराने अहवाल प्राप्त करता येऊ शकतो.

असा प्राप्त होईल 'एसएमएस'

नागपुरातील ऑटोमेशन मॅनिफोल्ड सर्विसेस प्रा. लि. (एएमएस) या कंपनीला सेन्सर बसविण्याचे काम देण्यात आले आहे. पुलाच्या ५ ते ६ फूट अंतरावर हे यंत्र बसविण्यात येते. पाण्याची पातळी ओलांडल्यानंतर त्या यंत्रात नोंद केलेल्या अधिकाऱ्यांना एसएमएस प्राप्त होतो. पूल कमी उंचीचा असेल तर यंत्र कमी अंतरावर ठेवले जाते. नागपूर जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या यंत्राद्वारे पुलावर पाणी चढण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना एसएमएस प्राप्त होतो. अधिकाऱ्यांना एसएमएस प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना त्याची सूचना दिली जाईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.

अपघात टळतील

यापूर्वी पुलावरून पाणी वाहू लागल्यानंतरच सरकारी यंत्रणा सक्रिय होत असे, मात्र बेसावध असताना पूल पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होत होते. या दुर्घटना टाळण्यासाठी आता या यंत्रणेचा वापर होणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सर्वेक्षण सुरू असून जिथे जिथे गरज आहे, तिथे पुलांवर सेन्सर बसविण्यात येणार असल्याचे विभागाकडून कळविण्यात आले.

कॅनडियन तंत्रज्ञानही हवे

पाण्याच्या पातळीबरोबर जीर्ण पुलांची माहिती देणारे सेन्सरही बसविण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. पूल जीर्ण झाल्यानंतर केव्हा पडेल याचा काही नेम नसतो. मात्र अशी दुर्घटना घडल्यानंतर होणारे नुकसान न भरून निघणारे असते. त्यामुळे पुलाच्या बांधकामांमध्ये कॅनेडियन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार कॅनडा भारत उत्कृष्टता अनुसंधान केंद्राच्यावतीने मांडण्यात आला. कॅनेडियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुलावर किंवा इमारतीवर अत्याधुनिक सेन्सर लावले जातात. पुलाच्या स्थितीची इत्थंभूत माहिती संगणकावर यामुळे प्राप्त होते. पुलाची क्षमता, वाहतुकीचा भार सहन करू शकेल की नाही याची माहिती, हवेच्या दाबाबरोबर पर्यावरणाची स्थिती यासह भविष्यातील संभाव्य धोकेही या सेन्सरमुळे माहीत पडतात. दुर्घटना टाळण्यासाठी अशा सेन्सरचा वापर नागपुरातही करण्यात यावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज