म.टा.प्रतिनिधी, नागपूर
‘देशात अनेक प्रश्न आहेत म्हणून हातावर हात देऊन बसू नका. ते प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या आणि त्यासाठी नवे मार्गही शोधा. कोणतेही मोठे यश एका रात्रीत मिळत नाही. संयम, सातत्य आणि निश्चित उद्देशाने प्रयत्न केल्यास ते नक्कीच मिळते’, असा सल्ला प्रसिद्ध लेखिका रश्मी बन्सल यांनी नागपुरातील तरुणांना दिला.
दत्ता मेघे इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्यावतीने बन्सल यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. चिटणवीस सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी यशस्वी उद्योजकतेचे आणि करिअरचे धडे विद्यार्थ्यांना दिले.
सुमारे तासाभराच्या या कार्यक्रमात बंसल यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वानुभवदेखील मांडले. अलीकडच्या काळात तरुणांना फारच लवकर मोठी पदे आणि पगार मिळतो. मात्र, याचा अर्थ ते सगळे मिळवण्याची योग्यता त्यांनी मिळवली आहे, असे नाही. चारचौघांसारखे जगणे वाईट नाही, पण ते काही सर्वोत्कृष्ट जगणे नव्हे. इतर कोणी तुम्हाला काय सांगते, याचा विचार करू नका. स्वतःला सर्वाधिक ओळखणारे आपणच असतो. स्वतःबद्दलच्या शंका जे लोक दूर सारू शकतात, त्यांनाच आयुष्यात यश मिळते, असे बन्सल यावेळी म्हणाल्या. व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. चिब, प्राध्यापक तसेच व्यवस्थापन विभागाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
--तासाला ४० हजार पोळ्या
इस्कॉन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. दक्षिणेत सांबार-भात बनिवण्याचा अनुभव इस्कॉनच्या गाठीशी होता. मात्र, उत्तर भारतात त्यांना पोळी देणे आवश्यक होते. हजारो विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या पोळ्या तयार करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला महिला कारागीर नियुक्त केल्या. पण इतक्या मोठ्या संख्येने पोळ्या पुरविणे अशक्य होऊ लागले. पोळ्या तयार करणारी मशिन विदेशाशिवाय मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतातच ती तयार करून घेण्यात आली. या मशिनच्या साहाय्याने दर तासाला ४० हजार पोळ्या बनविल्या जातात आणि विद्यार्थ्यांचे पोषक आहार पुरविण्याचे काम केले जाते, अशी माहिती बन्सल यांनी यावेळी दिली. इस्कॉनने देशभरात चालविलेल्या या सेवाकार्यावर त्यांचे ‘गॉडस् ओन किचन’ हे पुस्तक लिहिले असून लवकरच ते वाचकांना वाचायला मिळणार आहे.