अ‍ॅपशहर

शेतकरी आण‌ि पांढरपेशे

शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात सामान्य जबाबदार नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. सर्व प्रश्न शासनानेच सोडवावे असे अजिबात नाही. अशा वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. परंतु तरीदेखील काही प्रश्न उपस्थित होतातच. पांढरपेशा व्यक्ती या वास्तवाशी स्वतःला जोडून घेत नाहीत.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am
अलीकडेच पहिली शेतकरी आत्महत्या होऊन तीन वर्षे झालीत. त्या कुटुंबीयांच्या स्मरणार्थ अन्नदात्यासाठी काही तासांसाठी अन्नत्यागची हाक जनमंचने दिली. त्याला काही संवेदनशील व्यक्तींनी पूर्णवेळ पाठिंबा दिला, तर अनेक व्यक्ती येऊन-जाऊन मांडवात उपस्थिती दर्शवित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur suniti dev column
शेतकरी आण‌ि पांढरपेशे


‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हे एक भयाण वास्तव आज समोर ठाकले आहे. पूर्वीदेखील बेभरवशाचा पाऊस, कर्ज, सावकारी विळखा, नापिकी ही अस्मानी/सुलतानी संकटे शेतकऱ्यांसमोर होतीच. तो कर्जातच जन्मत होता, जगत होता व मरत होता. परंतु त्याने कधीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नव्हता. मग आज अशी कोणती परिस्थिती आहे, की जी त्याला जीवन संपविण्यास बाध्य करतेय?

एक नाही अनेक कारणे आहेत. शासनाचे कृषिधोरण, अपुरा पाऊस, अवेळी होणारी गारपीट, ओळीने वर्षानुवर्षे नापिकी, मालाला रास्त भाव न मिळणे, मधल्यामध्ये दलालाने आपली पोळी भाजून घेणे, दुबार/तिबार पेरणी, बियाण्यांमध्ये फसवणूक, बँकांचे तगादे आण‌ि सावकार आहेच टपलेला. कारणांची ही यादी आणखीही वाढू शकते. इतक्या सर्व बाजूंनी नाडल्या गेल्यावर जगण्याची उसनी उमेद आणायची कोठून?

सर्वसाधारणपणे सामान्य जनता तसेच शासनाच्या पातळीवरदेखील शेतकऱ्यांच्या दुर्दशेविषयी अनुचित उद्गार काढले जातात. ते आळशी आहेत, त्यांना काम करायला नको, दारूचे व्यसन आहे, मिळालेल्या अनुदानातून मुलीचे लग्न करतात, जनावरे मिळालीत तर विकून टाकतात इत्यादी. क्षणभर वादासाठी हे मान्य केले तरी सर्वच शेतकरी असे करीत नाही आणि तुम्ही कोणते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात? एकीकडे मोठे मासे पैसे खाऊन पलायन करतात अन् इकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘अभ्यास’ करावा लागतो. तुमचे प्राधान्य क्रम कोणते? राजकीय इच्छाशक्तीच नाही हे मुख्य कारण आहे. आत्ता अलीकडील बातमी वाचली, की वर्धेच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधीने फसवणूक करणारा व्यापारी हा सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेशी संबंधित असल्यामुळे पक्षाची प्रतिमा वाचविण्यासाठी या शेतकऱ्यांना त्यांचे आठ कोटी (अबब केवढा अपहार) रक्कम परत मिळणार आहे. म्हणजे पुन्हा राजकीय इच्छाशक्तीचाच मुद्दा आला.

शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात सामान्य जबाबदार नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. सर्व प्रश्न शासनानेच सोडवावे असे अजिबात नाही. अशा वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. जनमंच आहे. आपुलकीचा ग्रुप आहे. शिवाय शेतकऱ्यांची पुढची उच्चविद्याविभूषित पिढीदेखील काम करतेय. काही व्यक्तिगत पातळीवर शांतपणे, गाजावाजा न करता नियमित शेतकरी कुटुंबीयांना मदत करताहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची ‘नाम’ ही संस्था आहेच. अनिल किलोर, अमित पावडे, अभिजित फाळके व श्वेता भट्टड या तरुण फळीचा गौरवाने उल्लेख केला पाहिजे.

परंतु तरीदेखील काही प्रश्न उपस्थित होतातच. पांढरपेशा व्यक्ती या वास्तवाशी स्वतःला जोडून घेत नाहीत. माझा मुख्य रोख पांढरपेशा वर्गाकडे आहे. काही संघटना शेतकऱ्यांचा माल दलालांच्या मध्यस्थीशिवाय विकावयास आणतात. सेंद्रिय धान्य, भाजी थोडी महाग असेल, पण आपण खरेदी करायला हवी. सकस आहार ही आपली गरज आहे. ग्रामीण भागात जमीन आहे. श्रमजीवी वर्ग आहे, परंतु पुरेसे भांडवल नाही. तेथे गुंतवणूक करता आली तर रोजगार वाढेल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन न समजता देशाची संपत्ती निर्माण करणारे माध्यम समजायला हवे. एक दाणा पेरून दहा दाणे देणारी शेती टिकविणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आभाळच फाटले आहे, कोठे कोठे ठिगळ जोडणार हा विचार न करता आपापल्या पातळीवर ठिगळ जोडण्याचा प्रयत्न केला तर उद्या ‘गोधडी’ नक्की पूर्ण होईल याची मला खात्री आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज