म. टा. प्रतिनिधी, नागपूर
आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत सरसकट निकष लावून कोणताही उपचार केला जात नाही. आयुर्वेदात कफ, पित्त आणि वात या तीन दोषांना आजाराचे मूळ म्हटले जाते. मानवाच्या शरीरात अहोरात्र रासायनिक बदल घडत असतात. त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तत्कालीन आणि दीर्घकालीन परिणाम होत असतो. हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीत शरीरातील रसायनांचे संतुलन बिघडून आजार मूळ धरत आहेत. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांना बाहेरचा मार्ग दाखविण्यासाठी टॉक्झिन थेरेपीवर कल वाढत आहे, अशी माहिती डॉ. जयकृष्ण छांगाणी यांनी शनिवारी येथे दिली.
आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने रेशीमबागेत ‘मधुमेह व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका’ या विषयावर आयुर्वेद पर्वाचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉ. छांगाणी यांनी साधलेल्या संवादात ही माहिती दिली. आयुर्वेदात वात, कफ आणि पित्त हे तीन मुख्य दोष आजार आणि रोगाचे मूळ मानण्यात आल्याचे नमूद करीत डॉ. छांगाणी म्हणाले, ‘आयुर्वेदात विविध व्याधींवर विविध चिकित्सा सांगितल्या आहेत. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचाराची दिशा ठरविली जाते. हल्लीच्या जीवनशैलीत ताम आणि पित्तप्रकृती वाढत आहे. कामाचा ताण, आहार अनियमितता, दिनचर्येचा बदलत्या सवयी आणि व्यसनांमुळे शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडत आहे. आयुर्वेदात याला आमदोष म्हणतात. तामसिक प्रकृतीवर उपचार करताना शमन आणि शोधन अशा दोन उपायांचा आधार घेतला जातो. शमन हा औषधांवर आधारित आहे. तर शोधनमध्ये पंचकर्म आहे. याला आधार म्हणून योगा आहे. या तिघांचा समन्वय साधून तामसिक दोष असलेले रुग्ण टॉक्झिन थेरेपीला प्राधान्य देत आहे.’
एकट्या शासकीय आयुर्वेदच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या १०० रुग्णांपैकी किमान २० रुग्णांना अशा उपचारांची गरज असते, असेही त्यांनी नमूद केले.