विजांचेही तांडव : रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प; आज सतर्कतेचा इशारा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी शहराला धो धो धुतले. संपूर्ण नागपुरातील रस्ते जलमय झाल्याने अनेक चौकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. विविध परिसरांमधील वस्त्यांमध्येही पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. ऐन गौरीपूजनाच्या वेळीच पावसाचा जोर वाढल्याने घरोघरी धावपळ दिसली. आज, शनिवारी शहरात परत एकदा अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाला सतर्कतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या अतिवृष्टीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द करावा लागला आहे.
शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. दुपारी एकनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. संपूर्ण शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
हवामान खात्यानुसार, गेल्या आठवड्यात २९ ऑगस्ट रोजीपासून मान्सून मध्य भारतात परत एकदा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सध्या ओडिशामार्गे छत्तीसगडकडे सरकला आहे. याचा परिणाम पूर्व विदर्भावर होत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
विजा कडाडल्या, वाहतूक ठप्प
गेल्या दोन दिवसांपासून शहरात चांगला पाऊस सुरू होता. शुक्रवारची सकाळसुद्धा ढगाळच होती. दुपारी एकनंतर शहरातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दहा ते पंधरा मिनिटांतच शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर पाणी साचले होते. याचा मोठा फटका वाहतुकीला बसला. यामुळे बऱ्याच काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांचा बराचसा भाग साचलेल्या पाण्यात बुडाल्याने या वाहनांचे नुकसान झाले. यात शंकरनगर, रामदासपेठेतील अनेक चौक, दिघोरी परिसर, इंदोरा परिसर, हरिहर मंदिर या भागांचा प्रामुख्याने समावेश होता.
विकासकामांमुळे गैरसोय
शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. यामुळे विविध रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये खोदकाम सुरू आहे. नरेंद्रनगर चौक, हिंगणा मार्गावरील चौक, सेंट्रल एव्हेन्यू तसेच पारडीमधील विविध ठिकाणे अशा परिसरात विकासकामांमुळे केलेले खोदकाम आणि शुक्रवारी झालेला मुसळधार पाऊस यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
गौरींच्या पंगतीत खोळंबा
शुक्रवारी गौरीपूजन आणि नैवेद्याचा मुहूर्त होता. शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या पंगतींचा खोळंबा झाला. मुख्यत्वे ज्यांच्याकडे दुपारी नैवेद्याच्या जेवणावळी होत्या त्यांना बरीच अडचण सोसावी लागली. अनेकांना नैवेद्याला जाणे रद्द करावे लागले. याचा थोडा फार परिणाम बाजारावरसुद्धा पडला.
गणेश मंडळांचा वीकएण्ड बिघडला
सोमवारी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. वीकएण्डला शहरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांना भेट देण्याचे नियोजन नागपूरकरांनी केले होते. मात्र, शनिवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आल्याने या नियोजनावरसुद्धा पाणी फेरले गेले.
कॅब सुविधा, झोमॅटोचे दर वाढले
गेल्या पाच दिवसांपासून ओला आणि उबेरच्या काही चालकांनी संप पुकारला. पुरेसे चालक उपलब्ध नसल्याने या कॅब सेवांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यातच गौरी नैवेद्याच्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कॅबची मागणी अधिकच वाढली होती. यामुळे कॅब सुविधेचे दर अजूनच वाढले. इतकेच नाही तर झोमॅटो, स्विगी, उबेर इट्स, या 'फूड सर्व्हिस' पुरविणाऱ्यांचेही दर चढे होते. तसेच त्यांच्या पार्सल पुरविण्याच्या वेळेतही वाढ झाली होती.
ठळक मुद्दे
-शुक्रवारी ६ वाजेपर्यंत शहरात ७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
-यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस
-आज शनिवारीसुद्धा अतिवृष्टीचा इशारा
-भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ येथे रेडअलर्ट
रेडअलर्ट म्हणजे काय?
जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज असल्यास हवामान खात्यातर्फे रेडअलर्ट दिला जातो. शुक्रवारी दुपारपर्यंत शहरात रेडअलर्ट नव्हता. मात्र, शुक्रवारी दुपारी हवामान खात्याने शहरात तो जाहीर केला. शनिवारीसुद्धा हा रेडअलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. यानुसार, शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात १२० मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टीची म्हणजेच २०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आजवर नागपुरात झालेले विक्रमी पर्जन्यमान
१२ जून १९११ : ३१५ मिमी
२१ जुलै १९९४ : ३०४ मिमी
०६ जुलै २०१८ : २८२ मिमी
२२ जुलै २००६ : १७३.९ मिमी