अ‍ॅपशहर

स्वामी समर्थांना विधवांच्या हस्ते अभिषेक

शनी शिंगणापूर येथे शनीच्या चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारण्यावरून राज्यभर वादंग होऊन अखेर तेथे महिलांना प्रवेश मिळाला. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या स्वामी समर्थ मंदिरातील विधवांच्या हस्ते स्वामींना अभिषेकाची प्रथा ठळकपणे उठून दिसणारी आहे.

Maharashtra Times 11 Apr 2016, 8:17 am
avinash.mahalaxme@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur widows perform pooja in swami samartha temple
स्वामी समर्थांना विधवांच्या हस्ते अभिषेक


नागपूर : शनी शिंगणापूर येथे शनीच्या चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारण्यावरून राज्यभर वादंग होऊन अखेर तेथे महिलांना प्रवेश मिळाला. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या स्वामी समर्थ मंदिरातील विधवांच्या हस्ते स्वामींना अभिषेकाची प्रथा ठळकपणे उठून दिसणारी आहे.

नागपूरला बेसा येथे हे स्वामिधाम आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून विधवांच्या हस्ते अभिषेकाची प्रथा आहे. आपल्या देशात वैधव्य आलेल्या महिलांना धार्मिक कार्यात सहभागी करून घेणे अपवित्र मानण्याची परंपरा आधी होती. आताही काही भागांत आहे. मात्र, या मंदिराने विधवांच्या हस्ते महाभिषेकाची परंपरा सुरू केली आहे.

कोणत्याही मंदिरात अभिषेक असला की पुरुष एकट्याने किंवा नवरा-बायको दोघे जोड्याने अभिषेकाला बसत असतात. एखादी महिला विधवा असेल आणि तिला अभिषेक करायचा असेल तर ती आपल्या दिवंगत पतीच्या नावाने अभिषेकाची पावती फाडून अभिषेक करवून घेत असते. पण, तिला स्वतःला मात्र अभिषेक करता येत नाही. म्हणजे जो पती हयात नाही त्याच्या नावाची पावती फाडायची पण जी महिला जिवंत आहे तिला मात्र अभिषेकाचा अधिकार मिळत नाही. स्वामिधामचे अध्यक्ष दिनकरराव कडू यांना विधवा स्त्रियांना मंदिरात अभिषेकाच्यावेळी मिळणारी ही वागणूक अपमानास्पद वाटली आणि त्यांनी बेसा येथील स्वामी समर्थ मंदिरात विधवा महिलांच्या हस्ते महाभिषेकाची प्रथा सुरू केली.

सुरुवातीला त्यांनी मंदिर परिवारातील विधवा महिलांच्या हस्ते महाभिषेक केला. त्यानंतर आता ही प्रथाच येथे सुरू झाली आहे. या मंदिरात दर गुरुवारी स्वामी समर्थांना महाभिषेक असतो. त्यासाठी देणगी शुल्क भरावे लागते. मात्र, विधवा महिला तसेच ज्यांची इच्छा आहे पण देणगी शुल्क देण्याची परिस्थिती नाही, त्या सर्वांना महाभिषेक निःशुल्क करता येतो.

विधवांनी दिलेली देणगी चालते मात्र त्यांचा पूजेत सहभाग चालत नाही, हे आपल्याला विचित्र वाटले. त्यामुळे ही प्रथा सुरू केल्यावर काहींनी वैयक्तिकरीत्या नाराजीही व्यक्त केली होत. मात्र, मंदिर व्यवस्थापनाने ही परंपरा सुरूच ठेवली, असे कडू यांनी ‘मटा’ला सांगितले.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आराधना परिवारतर्फे १३ जुलै २००३ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मंदिर बांधून तेथे स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ७०० किलो वजनाची ही पंचधातूची मूर्ती पुण्यावरून आणली आहे. गाभाऱ्याच्या खाली तळघरात असलेल्या ध्यानकक्षात अक्कलकोटप्रमाणे शिवलिंगावर स्वामींचा मुखवटा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज