म.टा. प्रतिनिधी, नागपूर तो दिवसभर खेळत असायचा. सतत काही तरी खोड्या काढायचा किंवा काही प्रश्न विचारायचा. त्यामुळे त्याच्या शाळेची वेळ सोडली तर दिवसभर घर कसं भरल्या भरल्यासारखं असायचं. तो शाळेत जायचा तेव्हाच काय ती घरात शांतता असायची, तेवढी शांततासुद्धा मनाला बोचत असे. आता तर तोच नाही. तरीही त्याच्या आठवणी आहेत. त्याच्याशिवाय जगणारा हर पल एक ‘युग’ जैसा लगता है, अशी परिस्थिती युगच्या आईची आहे. कोणत्याही शिक्षेने अथवा निर्णयाने आपले दुःख भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया युगची आई डॉ. प्रेमल चांडक यांनी व्यक्त केली. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा हायकोर्टाने याप्रकरणी आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी फाशीवर शिक्कामोर्तब करण्याकरिता हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी गुरुवारी संपली. हायकोर्टानेही ही दुहेरी फाशी कायम ठेवली. याबाबत डॉ. प्रेमल चांडक यांच्याशी संपर्क साधला असताना त्या म्हणाल्या, ‘माझ्या वाटेला आलेले दुःख कुणाच्याही वाटेला येऊ नये. त्यामुळे आज झालेला निर्णय उत्तमच आहे असे मी म्हणेन. यामुळे गुन्हेगारांना जरब बसेल. असाच निर्णय कुश कटारिया प्रकरणी झाला असता तर कदाचित माझा युग वाचला असता. आजही या निर्णयाने अथवा युगच्या मारेकऱ्यांच्या फाशीने माझा युग परत येणार नाही, हे मला माहिती आहे. त्याची आठवण मला प्रत्येक क्षणी येतच राहणार. परत असे कृत्य करण्यापूर्वी गुन्हेगार दहा वेळा विचार करतील आणि अनेक चिमुकल्यांचा जीव वाचेल, याचेच मला समाधान आहे.’ ... हा न्याय नव्हेच... नागपूर : ‘राजेशच्या हातून गुन्हा घडला, हे मान्य आहे. युग चांडक परत येणार नाही. एका मातेने मुलगा गमावला, हेही खरे असले तरी जशास तसा हा न्याय होत नाही. हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला तो तयार आहे. त्याला सुधारण्याची एक संधी द्या’, असा टाहो राजेश धनलाल दवारेची आई भूमेश्वरीने निकाल ऐकताच फोडला. युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा खंडपीठाने कायम ठेवली. खंडपीठाच्या निकालाकडे जसे राज्याचे लक्ष लागले होते तसेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या राजेशच्या कुटुंबीयांचा जीवही मात्र टांगणीला लागला होता. त्यामुळे हा निकाल लागल्याचे कळल्यापासून राजेशची आई भूमेश्वरीच्या दुःखाला पारावार उरला नाही. एकसारख्या शून्यात हरवलेल्या भूमेश्वरी काळजावर दगड ठेऊन कशाबशा बोलत्या झाल्या. ‘माझा मुलगा असा नव्हता. ज्यादिवशी ही घटना घडली, त्याच्या १५ दिवस आधीपासून तो सतत ताणात होता. राजेश अट्टल गुन्हेगार नाही. त्याच्या हातून नादानतेत हे कृत्य घडले. जे झाले त्याचा त्यालादेखील पश्चाताप आहे. गुन्ह्याचे प्रायश्चित्त भोगायला तो तयार आहे. मात्र, न्यायालयाने दिलेला निकाल हा त्याच्या पश्चातापाच्या भावनेचा विचार करणारा नाही. त्यामुळे युगच्या बदल्यात त्याचा जीव घेणे हा कुठला न्याय आहे? मायबाप सरकार, गरिबाच्या लेकराचा असा जीव घेऊ नका. त्याला सुधारण्याची एक संधी द्या’, असा आक्रोश ही माता करीत होती. राजेशचे वडील धनलाल यांनादेखील न्यायालयाचा हा निकाल मान्य नाही. ते सांगत होते, ‘माझ्या मुलाच्या हातून जे घडले, त्यावर इतकी कठोर शिक्षा देऊ नका. ही शिक्षा केवळ राजेशला नाही, तर आमच्या कुटुंबालाही ती किंमत सोसावी लागतेय. त्यामुळे त्याची जगण्याची संधी हिरावून घेऊ नका.’
हर पल ‘युग’ जैसा
तो दिवसभर खेळत असायचा. सतत काही तरी खोड्या काढायचा किंवा काही प्रश्न विचारायचा. त्यामुळे त्याच्या शाळेची वेळ सोडली तर दिवसभर घर कसं भरल्या भरल्यासारखं असायचं. तो शाळेत जायचा तेव्हाच काय ती घरात शांतता असायची, तेवढी शांततासुद्धा मनाला बोचत असे. आता तर तोच नाही. तरीही त्याच्या आठवणी आहेत. त्याच्याशिवाय जगणारा हर पल एक ‘युग’ जैसा लगता है, अशी परिस्थिती युगच्या आईची आहे. कोणत्याही शिक्षेने अथवा निर्णयाने आपले दुःख भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया युगची आई डॉ. प्रेमल चांडक यांनी व्यक्त केली.
Maharashtra Times 6 May 2016, 4:29 am