अ‍ॅपशहर

नक्षलवाद्यांविरोधात आदिवासींचा जाहीर उठाव

वर्षानुवर्षे दहशतीच्या छायेत वावरणाऱ्या गडचिरोलीतील आदिवासी जनतेनं नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाला जाहीर आव्हान दिलं आहे. 'शहीद सप्ताह' पाळण्याचं नक्षलवाद्यांचं आवाहन झुगारून देत गडचिरोलीतील काही गावातील आदिवासींनी नक्षलवाद्यांची पोस्टर व पत्रकं जाळून टाकली आहेत.

Maharashtra Times 28 Jul 2017, 12:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम naxal martyr week suffers setback as tribals protest burn pamphlets
नक्षलवाद्यांविरोधात आदिवासींचा जाहीर उठाव


वर्षानुवर्षे दहशतीच्या छायेत वावरणाऱ्या गडचिरोलीतील आदिवासी जनतेनं नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाला जाहीर आव्हान दिलं आहे. 'शहीद सप्ताह' पाळण्याचं नक्षलवाद्यांचं आवाहन झुगारून देत गडचिरोलीतील काही गावातील आदिवासींनी नक्षलवाद्यांची पोस्टर व पत्रकं जाळून टाकली आहेत. गावकऱ्यांचा हा उठाव नक्षलवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आजपासून म्हणजेच, २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत 'नक्षल शहीद सप्ताह' पाळण्याचं आवाहन नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील आदिवासी गावांना केलं होतं. मात्र, या सप्ताहाला विरोध करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गावकऱ्यांना केलं. देशमुख यांच्या आवाहनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नक्षल सप्ताहाला जाहीर विरोध दर्शवत गडचिरोलीतील अनेक तालुक्यांतील नागरिक रस्त्यावर उतरले. धानोरा तालुक्यातील मरकेगावातील ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या पत्रकांची होळी केली. धानोऱ्यासह अहेरी, कुरखेडा, भामरागड या तालुक्यांतील नागरिकांनी त्यांच्याकडील बंदुका जमा केल्या.

नक्षलवादी चळवळीचा संस्थापक सदस्य असलेल्या चारू मुजुमदार याच्या स्मरणार्थ नक्षलवाद्यांकडून २८ जुलैपासून शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या काळात नक्षलवादी आदिवासी भागांत फिरून आदिवासी तरुणांना चळवळीत सक्रिय होण्याचं आवाहन करतात. बैठका घेऊन त्यांचं ब्रेन वॉशिंग करतात. अलीकडं या कारवायांना आदिवासी गावांतून विरोध होऊ लागला आहे. आदिवासी नागरिक नक्षलवाद्यांच्या विरोधात पोस्टर लावत आहेत. पत्रकं वाटत आहेत. नक्षलवादी चळवळीत सामील न होण्याचं आवाहन करत आहेत. मरकेगाव इथं प्रथमच आदिवासींनी जाहीरपणे रस्त्यावर येऊन नक्षलवाद्यांना आव्हान दिलं आहे. नक्षलवाद्यांचे बंद व सप्ताहामुळं आमचा आजवर काहीही फायदा झालेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

मरकेगावातील नागरिकांनी उघडपणे नक्षलवाद्यांच्या विरोधात उभं राहणं हा सुरक्षा दलांचा नैतिक विजय मानला जात आहे. 'याच गावातील लोकांचा वापर करून २००९ साली नक्षलवाद्यांनी १४ पोलीस जवानांची निर्घृण हत्या केली होती. त्याच गावात नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवला जाणं हा सकारात्मक बदल असल्याचं एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज