अ‍ॅपशहर

कार्यक्रमास तरी पूर्ण वेळ द्या, गृहमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गुजर यांनी काढली भडास

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील बेबनाव समोर येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी ही उघड होत आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीतच नाराजी जाहीर केली.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 21 Apr 2022, 11:01 am
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : 'महिन्यातून एखादा दौरा देता, कार्यक्रम घेण्याची सूचना करता तरीही पूर्ण वेळ देत नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात', अशी भडास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राज्याचे गृह व जिल्ह्याचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत काढली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp leader and home minister dilip walse patil baba gujar disappointments
कार्यक्रमास तरी पूर्ण वेळ द्या, गृहमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गुजर यांनी काढली भडास


उमरेड येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना गुजर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मेळाव्यासाठी संपर्कमंत्र्यांनी सव्वा तास दिला होता. उशिरा आले आणि ४० मिनिटांत गेले. जिल्हाध्यक्षांना कुठलीही माहिती नसताना भिवापूरमध्येही कार्यक्रम झाला. त्यामुळे अध्यक्षांनी भडास काढली.

कार्यकर्ता मेहनत करतो, बॅनर लावतो, गाड्या लावतो; पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वेळात उपस्थित राहावे, वेळ दिल्यावर वेळेत यावे. जिल्हाध्यक्षांना विचारल्याविना कार्यक्रम देऊ नये, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असेही गुजर म्हणाले.

जिल्ह्यातील दोन बडे नेते आपल्याच विधानसभा मतदारसंघात लक्षात देतात. काटोल व हिंगण्याखेरीज अन्य चार मतदारसंघाकडे कुणी लक्ष देत नाही. प्रत्येक निवडणुकीत हस्तक्षेप करून नेते पानिपत करतात. नेते गटबाजीला खतपाणी टाकतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका जिल्हाध्यक्षांच्या अधिपत्याखाली घेण्यात याव्यात. अन्य नेत्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये आणि अशा फोकनाडबाज नेत्यांपासून पक्षाला संरक्षण द्यावे, असेही गुजर म्हणाले. संपर्क मंत्री म्हणून तालुकानिहाय अध्यक्षांचे कामे, अडचणी दूर कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विलास झोडापे यांनी मेळावा आयोजित केला होता. संचालन कैलास हुडमे यांनी केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार, उज्ज्वला बोढारे, अविनाश गोतमारे, सलिल देशमुख, चंद्रशेखर चिखले आदी उपस्थित होते.

सत्तेविना कासाविस

भोंग्यावरून हिंदू व मुस्लिम धर्मातील लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव आहे. सत्तेविना कासाविस झालेल्यांकडून राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे, असा हल्ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उमरेड येथील कार्यक्रमात चढवला.

महत्वाचे लेख