काविळीच्या साथीने दिला जन्म
Lalit.patki@timesgroup.com
Tweet@lalitpatkiMT
नागपूर : करोना महामारीने आज जगभरात थैमान घातले आहे. गरज ही शोधाची जननी असते या वाक्यानुसार आता या रोगावरील औषधासाठी संशोधन सुरू झाले आहे. शहरातील 'नीरी' या प्रसिद्ध संशोधन संस्थेचाही जन्म काविळ या महामारीतूनच झाला होता. तेव्हा नीरीचे नाव आणि काम दोन्ही वेगळे, मर्यादित होते. पुढे या संस्थेचे रूपांतर पर्यावरण क्षेत्रातील एका संशोधनमयी वटवृक्षात झाले.
१९५६चे ते साल. राजधानी दिल्लीमध्ये काविळीच्या साथीने धुमाकूळ घातला. या आजाराने अनेकांचा बळी घेतला. आरोग्य यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाली. दूषित पाण्यापासून होणारे आजार थांबण्याचे नाव घेत नव्हते. अखेर केंद्र सरकारने दूषित पाण्याचा मुद्दा गांभीर्याने घेतला. या क्षेत्रात संशोधन करणारी एक संस्था असावी, या उद्देशाने 'सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट' या संस्थेचा जन्म झाला. हेच नीरीचे मूळ नाव. नागपुरात सेमिनरी हिल्समधील एका टेकडीवर चार भिंतीवर आणि एक साधे छत टाकून ही संस्था अस्तित्वात आली.
इंदिरा गांधींनी दिली नवी दिशा
पन्नासच्या दशकात पर्यावरणाच्या समस्या पाण्यापुरत्या मर्यादित होत्या. त्यामुळे जनतेला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा आणि परिणामतः संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी उपयुक्त संशोधन करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. पुढे जगभरातील अन्य काही संशोधनांमुळे आणि त्याच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची हानी वाढू लागली. काळ इतका झपाट्याने बदलू लागला की पुढे सत्तरच्या दशकात जगभरात आणि आशिया खंडातही 'प्रदूषण' या विषयावरील चर्चा वाढू लागली. अखेर संयुक्त राष्ट्रांनी १९७२ साली यावर सांगोपांग चर्चेच्या उद्देशाने स्टॉकहॉल्म येथे 'युनायटेड नेशन्स इंटर-गव्हरर्नमेन्टल कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हॉयर्नमेंट' ही परिषद घेण्याचे ठरविले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या परिषदेला उपस्थिती दर्शविली. त्याकाळी इतर महत्त्वाच्या देशांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या संशोधनाचा आवाका त्यांच्या लक्षात आला होता. भारताने अद्याप त्या दृष्टिकोनातून पाऊलही उचलेले नव्हते. ते आता उचलावे लागणार होते. नागपुरातील 'सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट' ही संस्था पर्यावरणातील काही मर्यादित क्षेत्रांत काम करीत होती. याच संस्थेला मोठे स्वरूप देऊन या क्षेत्रात पाऊल टाकण्याची वेळ आता आली होती. इंदिरा गांधी यांनी १९७४ साली या संस्थेचे नामकरण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नॅशनल एन्व्हॉयर्नमेंट रिसर्च इन्स्टिट्युट) अर्थात नीरी असे केले.
संशोधनाची व्याप्ती
आता मात्र नीरीची व्याप्ती बरीच वाढली आहे. जलप्रदूषण या एका मर्यादित उद्दिष्टासाठी सुरू झालेली ही संस्था आज बायोटेक्नॉलॉजी, कचरा आणि घातक कचरा व्यवस्थापन, एन्व्हॉयर्नमेंटल सिस्टीम डिझाइन, मॉडेलिंग, ऑप्टिमायझेशन अशा सगळ्या बाबींचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अभ्यास आणि संशोधन ही संस्था करते आहे. सेतुसमुद्रम, दिल्ली कॉमनवेल्थ, देशभरातील विविध खाणी तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांचा पर्यावरणावरील परिणाम आणि त्याचे मूल्यांकन अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या ही संस्था सांभाळते आहे. संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे असून मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथे या संस्थेची क्षेत्रीय कार्यालये आहेत. संस्थेचे सुरुवातीच्या काळातील उद्दिष्ट हे जलप्रदूषण आणि सांडपाणी या क्षेत्रातील संशोधनापुरते मर्यादित होते. आज हे उद्दिष्ट नीरीच्या एकूण १४ विभागांपैकी दोन विभागांपुरते मर्यादित राहिले आहे. यावरून गेल्या सहा दशकांत नीरीमध्ये झालेल्या परिवर्तनाचा अंदाज येतो.