अ‍ॅपशहर

नीरी रोखणार प्रदूषणाचा आंतरराष्ट्रीय प्रवास, राष्ट्रीय आराखडा होणार

संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टॉकहोम करार परिषदेमधील (कन्व्हेन्शन) करारानुसार भारताला अत्यंत घातक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या 'पर्सिस्टंट ऑगनॅनिक पॉल्युटंट'वर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

Authored byललित पत्की | महाराष्ट्र टाइम्स 6 Jul 2022, 1:17 pm
नागपूर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टॉकहोम करार परिषदेमधील (कन्व्हेन्शन) करारानुसार भारताला अत्यंत घातक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या 'पर्सिस्टंट ऑगनॅनिक पॉल्युटंट'वर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. प्रदूषणाच्या या घटकांचा प्रवास हा एका देशातून दुसऱ्या देशातही होतो. या घटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठीचे राष्ट्रीय स्तरावरील नियोजन करून ते संयुक्त राष्ट्रसंघापुढे सादर करण्याची जबाबदारी शहरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेवर (नीरी) सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neeri will stop the international journey of pollution
नीरी रोखणार प्रदूषणाचा आंतरराष्ट्रीय प्रवास, राष्ट्रीय आराखडा होणार


अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (युनेप) आयोजित परिषदेत पीओपीवर चर्चा झाली. यापूर्वीसुद्धा २००४ साली या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी १६५ देशांनी या प्रदूषण घटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा करार केला होता. यात भारताचाही समावेश आहे. त्यावेळी १२ रासायनिक प्रदूषण घटकांची यादी प्रकाशित करण्यात आली होती. करारावर सह्या करणाऱ्या सगळ्या देशांनी त्यावर नियंत्रण मिळविणे अपेक्षित होते. गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनामुळे या यादीत नव्या प्रदूषण घटकांची भर पडली आहे. आता या यादीत १२ ऐवजी ३० घटक आहेत, अशी माहिती नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी दिली.

'यूनो'पुढे सादर करणार नियोजन

या घटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील अग्रणी संशोधन संस्था या नात्याने ही जबाबदारी नीरीकडे सोपविण्यात आली आहे. या सर्व प्रदूषण घटकांच्या नियंत्रणाचे नियोजन करून त्यावर नीरीतर्फे राष्ट्रीय अंमलबजावणी आरखडा तयार केला जाईल. तो वने व पर्यावरण मंत्रालयापुढे सादर केला जाईल. मंत्रालयाकडून तो आराखडा संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (युनेप) या संस्थेपुढे सादर केला जाईल, अशी माहिती संस्थेचे शास्त्रज्ञ व प्रकल्पाचे समन्वयक डॉ. रमेश कुमार यांनी दिली.

प्रदूषण घटकांचा विपरीत परिणाम

पीओपी अर्थात 'पर्सिस्टंट ऑगनॅनिक पॉल्युटंट' म्हणजे दीर्घकाळ टिकणारे रासायनिक प्रदूषण घटक. ते विषारी असून मानवी आरोग्यावर आणि जगभरातील पर्यावरणावर त्यांचा विपरीत परिणाम होतो. मुख्य म्हणजे एका देशात तयार झालेली ही रसायने वारा आणि पाण्याच्या माध्यमातून बराच दूरपर्यंतचा प्रवास करीत दुसऱ्या देशातही जाऊ शकतात. वारा आणि पाण्यात ती सहज मिसळतात. ती दृश्य स्वरूपात नसतात, त्यामुळे अन्न व पाण्यावाटे ती मानवाच्या तसेच प्राण्यांच्या शरीरात शिरतात आणि दीर्घकाळासाठी शरीरातच राहतात. याचा त्यांचा आरोग्यावर भयंकर परिणाम होऊ शकतो.

000

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज