म.टा. प्रतिनिधी, नागपूर
'मेट्रो नियो' प्रवाशांसाठी एक योग्य मोबिलिटी पर्याय आहे. मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये वर्दळीच्या वेळेला वाहतुकीचे पर्यायी साधन म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
बाराव्या 'अर्बन मोबिलिटी इंडिया' परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित गोलमेज बैठकमध्ये 'सर्वांकरीता सार्वजनिक परिवहन' या विषयांवर डॉ. दीक्षित यांनी मेट्रो नियोचे सादरीकरण केले. लखनौ येथे आयोजित या परिषदेला शहर नगर सचिव दुर्गा शंकर मिश्रा, उत्तर प्रदेशचे सचिव राजेंद्र कुमार तिवारीप्रसन्ना पटवर्धन, डॉ. एव्सेल फ्रेडरिच, आर. के. मिश्रा आदी उपस्थित होते.
मेट्रो नियो प्रकल्प हा त्या शहरांसाठी उपयुक्त ठरू शकतो ज्या शहरामध्ये सर्वांत जास्त वर्दळ असते. त्या वेळेवर ५,००० ते १५,००० नागरिक प्रवास करत असतात. मेट्रो नियो प्रकल्प परिपूर्ण असून यावर होणारा खर्च इतर प्रकल्पाच्या तुलनेत कमी आहे. भारतामध्ये मेट्रो वाहनाऐवजी 'लाइट मेट्रो' (मेट्रो नियो) हा वाहतुकीच्या समाधानाकरता सर्वांना परवडण्याजोगे पर्याय असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
राज्य सरकारने नाशिकसाठी 'मास ट्रांझिट सिस्टिम' अंतर्गत मेट्रो नियोला मान्यता दिली आहे. महामेट्रोला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारीदेखील दिली आहे. देशात अशा प्रकारे राबविली जाणारा मेट्रो नियो हा पहिलाच प्रयोग आहे. नाशिक येथे सुरक्षित विश्वसनीय आणि आरामदायी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला चालना देण्याची जबाबदारी महामेट्रोला राज्य शासनाने नोव्हेबर २०१८ ला दिली होती.
इतर शहरांतही नियोजन
सर्वसाधारणपणे २०-३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता विविध उपायांवर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ ला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली. टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासंबंधी सर्व बाबींवर विचार करण्यासाठी तसेच या बाबीत एकवाक्यता आणण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. नाशिकनंतर आता इतर शहरातही 'मेट्रो नियो'चा प्रयोग राबविण्याचा विचार सुरू असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.