म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
'तथागत गौतम बुद्धाचा विचार, हा जगात शांतता प्रस्थापित करण्याचा व सुखसंपन्नता आणण्याचा मैलाचा दगड आहे. बुद्धाची विचारधारा ही प्रत्येक मानवात रूजेल आणि यातून जगात शांतता नांदेल,' असे प्रतिपादन निचीरेन शु जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फ्रेंडशिप असोसिएशनचे भदंत कानसेन मोचिदा यांनी व्यक्त केले. कामठीतील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापनदिनी ते बोलत होते.
'प्रत्येक मानवाला शांतता हवी असेल तर, जगात शांतता कायम करावी लागेल. बुद्धाचे तत्त्वज्ञान हे शांती सद्भावनावर आधारित आहे. आज जगात सर्वत्र अशांतता दिसून येते. सर्व मानवांनी बुद्धाचे विचार आत्मसात करावे. चंद्र हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो. हे एक सूचक आहे की बुद्धिजम भारताकडून पूर्वेकडे पसरत आहे तसेच सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचाच अर्थ बुद्धिजम पुन्हा जपान भारतास परत करीत आहे,' असे प्रतिपादन मोचीदा यांनी केले.
प्रारंभी जपान येथून आलेल्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख अॅड. सुलेखा कुंभारे यांनी जपान येथून आलेल्या वंदनीय भदंत व भिक्षू संघाचे ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे स्वागत केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. तर, कार्यक्रमाला भदंत कानसेन हासेगावा, भदंत कोशुन आकीझाकी, भदंत शिंग्यो इमाई, भंदत होशीन कावागीशी, भदंत शिंक्यो यामागुची यांच्यासह मोठ्या संख्येत भिक्षुगण उपस्थित होते.
.......
पूर्ण...रवी
.......