म.टा. प्रतिनिधी, नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जनतेच्या हिताची अनेक कामे केली आहेत. परंतु विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहे. देशभरातील श्रमिकांच्या समस्येनंतर केंद्र सरकारच्या धोरणांवर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि वर्षभरातील केंद्र सरकारने कर्तृत्व जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न करावे. सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले. भाजपमधील प्रवक्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी गोयल यांनी व्हिडीओ संवाद साधला. त्यावेळी त्यांना हे आवाहन करण्यात आले.
करोनावरील उपापयोजनांवरून सत्तारुढ व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप दावे-प्रतिदावे चालले आहेत. देशातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी भाजपची टीमही सज्ज झाली आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. एकीकडे वर्षपूर्ती तर दुसरीकडे करोनाचे संकट. त्यामुळे जल्लोष करण्यात येणार नसला तरी संवादातून पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालले आहेत. अशात केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनी संवाद साधत श्रमिकांसाठी केंद्राने केलेल्या कामाची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. विरोधी पक्षाकडून जनतेची दिलाभूल सुरू आहे. त्याला चोखपणे कसे प्रत्युत्तर द्यावे, यावर भर देण्याबाबत विचार करण्यात आला. गोयल यांनी सरकारने केलल्या विविध उपाययोजनांकडे लक्ष वेधले. श्रमिकांसाठी चालविण्यात आलेल्या विशेष रेल्वेंची माहिती गोयल यांनी विस्तृतपणे सादर केली. येत्या काही दिवसात नियमित रेल्वेसेवा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या संवादात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्याय, नागपुरातून प्रवक्ते गिरीश व्यास, अर्चना डेहनकर, मीडिया प्रभारी चंदन गोस्वामी आदी सहभागी झाले होते.
गडकरींचा आज संवाद
भाजपने सुरू केलेल्या संवादाच्या या श्रुंखलेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज, रविवारी दुपारी १२ वाजता राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते नेते, पदाधिकारी, प्रवक्ते यांच्याशी बोलणार आहेत.