म.टा.प्रतिनिधी,नागपूर
घटनायादीतील हलबा, हलबी जमातीला कोष्टी व्यवसायावरून न्याय मिळावा म्हणून राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे २३ ते २७ एप्रिलपर्यंत पाचदिवसीय साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधीबागेतील समाजरत्न कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ आदिम नेत्या अॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजतापासून उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या घटनायादीमध्ये हलबा, हलबी या जमातीचा समावेश असूनही विदर्भातील या जमातीला कोष्टी व्यवसायावरून भाजप सरकार नाकारत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारकडे निवेदन दिले. हलबा, हलबी जमातीचा कोष्टी व्यवसाय असल्याचा जीआर काढण्याचे सरकारने मान्य केले. परंतु, असा जीआर काढला नसल्याने जाततपासणी समितीकडून हलबांचे जाती प्रमाणपत्र रद्द करून अन्याय करण्यात येत असल्याची भावना आहे. भाजप सरकारने हलबांची मागणी मान्य करूनही अजूनपर्यंत जीआर काढून न्याय दिला नाही. म्हणून आदिम महिलांतर्फे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साखळी उपोषणास आदिम महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन अनिता हेडावू, गीता जळगावकर, शकुंतला वट्टीघरे, मंजिरी पौनिकर, मंजू पराते, मंदा शेंडे, सविता बुर्डे, आशा आसोटकर, प्रभावती देवघरे, अलका दलाल, शालू नंदनवार, शारदा खवास, ललिता पौनिकर, कल्पना अड्याळकर, ललिता खेताडे, प्रमिला वाडीघरे, निर्मला वरुडकर, निर्मला मोहाडीकर, कल्पना मोहपेकर, अर्चना उमरेडकर, लता खापेकर, हिरा पराते, चंद्रकला डेकाटे, गीता आमनेरकर, लीला मौदेकर, कमल पराते, लीला पिंपळीकर, शेवंता कोहाड, माधुरी निमजे, कल्पना बारापात्रे आदींनी केले आहे.