म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांचा हस्तक्षेप, हैदराबादचा शूटर नवाब शफात अली खान व मध्य प्रदेशातून आलेली टीम परत गेल्याने आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पण, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन हल्लेखोर वाघीण जेरबंद होईपर्यंत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांचे मुख्यालय नागपूरवरून पांढरकवड्याला हलविण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी मिश्रा हे पांढरकवड्याला पोहचले. आज, रविवारी सकाळी दहशतग्रस्त भागाला ते भेट देणार आहेत.
मिशन टी-१ मोहीम शनिवारी स्थनिक टीमच्या मदतीनेच राबविण्यात आली. वाघीण किंवा तिच्या बछड्यांचा शोध घेण्यात टीमला यश आले नाही. पाऊस झाल्याने आता वाघिणीच्या पावलाचे ठसे मिळण्यास अडचण येणार नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातून आणलेले जय आणि विजय हे दोन हत्ती लोणीच्या कॅम्पमध्येच असून त्यांच्यासोबत आलेली टीम परत गेली आहे. त्यांच्या ठिकाणी आता दुसरी टीम सोमवारपर्यंत वन विभागाच्या कॅम्पमध्ये पोहचणार आहे. यापूर्वी मिशन टी-१चे नेतृत्व पांढरकवडाचे उपवनसंरक्षक के. अभरणा यांच्याकडे होते. त्यात बदल करीत आता नेतृत्व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांच्याकडे गेले आहे. त्यांना सर्व घडामोडींची माहिती दर तीन तासांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळवायची आहे. वादग्रस्त शूटर नवाब शफात अली खान याला या मिशन टी-१मधून काढण्यात आल्याची चर्चा होती. मात्र नवाब मोहरमसाठी पाच दिवस हैदराबादला गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्णयाची अंमलबजावणीच नाही
मागील दोन वर्षांत १३ बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी दोन हत्तींसह विविध पथक, शूटर नवाब यांनी आठ दिवस सराटी, लोणीसह वाघिणीची दहशत असलेला भाग पिंजून काढला. त्यानंतरही वाघिणीचा सुगावा न लागल्याने गावकरी संतप्त आहेत. शेतीच्या हंगामाचे दिवस असल्याने शेतकरी, शेतमजूर व त्यांची जनावरे शेतात जात असताना त्यांच्यासोबत दोन वन विभागाचे कर्मचारी देण्याचा निर्णय झाला होता. पण, त्याची अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी, शेतमजुरांना शेतात जाणे कठीण झाले आहे.