खासगीकरणाविरोधात कामबंद
-आयुध निर्माणी कामगारांच्या आंदोलन
म.टा. वृत्तसेवा, भंडारा
आयुध निर्माणी कंपनीचे खासगीकरण करण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. देशातील सर्वच आयुध निर्माणीमध्ये हे आंदोलन सुरू झाल्याने संपूर्ण काम ठप्प पडले आहे.
मागील महिन्यात केंद्र सरकारने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीला विरोध म्हणून देशभरातील राष्ट्रीय संघटना, बीबीएमएस, आईएनटीयूसी, एआईडीएएल यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. मात्र, त्यात संघटनेला यश आले नाही. त्यानुषंगाने देशभरातील आयुध निर्माणीतील स्थानिक संघटनांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करीत खासगीकरण प्रस्ताव रद्द करण्याचा इशारा आंदोलनाद्वारे दिला होता. आयुध निर्माणी भंडारा (जवाहरनगर) येथील कर्मचाऱ्यांनी बाइक रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाकाढून निवेदन दिले.
दरम्यान, या निर्णयाचा विरोध करण्यासाठी मागील रविवारी रॉडल पाइंट ते जवाहरनगर वसाहतीतील मेन मार्केट यार्डदरम्यान कर्मचाऱ्यांनी रॅली काढली. या रॅलीत कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यही सहभागी झाली होती.
दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येथील चारही कर्मचारी संघटनेच्या लाल, भगवा, निळा, तिरंग ध्वज कर्मचारी हातात घेऊन खासगीकरणाचा निषेध नोंदवित आहेत. विशेष म्हणजे, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता केंद्र सरकारने राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व स्थानिक नेत्यांना नोटीस बजावली आहे. हा प्रकार म्हणजे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप स्थानिक नेत्यांनी यावेळी केला. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी निर्माणीतील वरिष्ठ ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निर्माणीत प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला़
या आंदोलनाचे नेतृत्व नीलेश भोंगाडे, चंद्रशील नागदेवे, रविकांत अहिरवार, आतिश दुपारे, हसन शेख, अनिल पटले, नाना जेठे, विकास बावनकुळे, रणजित बागडे, श्रीकांत इंगळे, योगेश झंझाड, ए. आर. मेश्राम, एम. टी. हुमने करीत आहेत.