अ‍ॅपशहर

विदर्भात पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. मान्सून दाखल होण्याच्या मार्गावर असतानाच सायंकाळच्या सुमारास पाऊस हजेरी

Maharashtra Times 11 Jun 2018, 1:49 am
-मशागतीची कामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांत आनंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rainfall in vidarbha
विदर्भात पावसाची हजेरी


टीम मटा

गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. मान्सून दाखल होण्याच्या मार्गावर असतानाच सायंकाळच्या सुमारास पाऊस हजेरी लावत असल्याने शुक्रवारपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्र चांगलाच बरसेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शनिवारनंतर रविवारीही विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाचे हजेरी लागली. काही जिल्ह्यांत वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटात दमदार सरी कोसळल्या. यामुळे मशागतीची कामे आटोपत असल्याचे चित्र शेतशिवारांत दिसून येत आहे.

वर्धा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी हजेरी

वर्ध जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांना 'पेरते व्हा' म्हणत लागवडीसाठी सहमतीच दिल्याचे दिसून येत आले. अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना सलग तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास होत असलेल्या पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यातील वर्धासह सेलू, पुलगाव, देवळी, कारंजा, आर्वी, आष्टी येथे मुसळधार, तर समुद्रपूर, हिंगणघाट येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असली तरी उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासाही मिळाला. पावसाच्या आगमनाने मशागतीच्या कामांनाही वेग आला आहे. रविवारी जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

गोंदिया जिल्ह्यात १५.४७ मिमी

गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून कधी रात्री, तर कधी सकाळी येणाऱ्या पावसामुळे शेतीहंगामाच्या कामाला जोर आला आहे. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३०.२७ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी १५.४७ मिमी पाऊस पडला. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३.२४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून बोंडगावदेवी मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर सूर्याचे दर्शन झाले. गोरेगाव तालुक्यासह इतर तालुक्याला पावसाने सकाळच्या सुमारास चांगलेच झोडपले.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात १ जूनपासून रविवारपर्यंत सरासरी १४३७ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या ८९.८१ टक्के पाऊस झाला आहे. रविवारीही जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६२ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. गेल्यावर्षी जूनचा पहिला आठवडा कोरडा गेला होता. यावेळी मात्र चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावले

चंद्रपूर जिल्ह्यातून शुक्रवारी सर्वप्रथम मान्सून विदर्भात प्रवेश केला. त्यानंतर पुढील ४८ तासांत जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पाऊस झाल्याने शेतकरीही मोठ्या आशेने शेतीच्या कामाला लागले आहेत.

बुलडाण्यात तुरळक

बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पावसाने तुरळक हजेरी लावली. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मेहकर तालुक्यात सरासरी ४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १.६३ इतका पाऊस झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज