रामणमध्ये अनुभवा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह; आज शेवटचा दिवस
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
अडॉल्फ हिटलर म्हटलं की डोक्यात पहिला विचार येतो तो हुकूमशाहीचा. दुसरा विचार येतो तो त्याने जगावर लादलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा आणि त्यामुळे घडलेल्या भयंकर हिंसेचा. हिटलर आणि शांतता हे शब्द विरुद्धार्थीच आहेत, असा आपला समज आहे. मात्र, याच हिटलरने दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनला तब्बल २८वेळा शांततेचे आवाहन केले होते. यातील अखेरच्या आवाहनाची पत्रके त्याने ऑगस्ट १९४०मध्ये विमानाद्वारे लंडन येथे टाकली होती. या पत्रकाची एक प्रत सध्या रामण विज्ञान केंद्रात बघण्यासाठी उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्ताने रामण विज्ञान केंद्र येथे एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हौशी संग्राहकांनी संग्रहित केलेल्या दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यातच आशुतोष कौशल यांच्या संग्रहातील हिटरलचे भाषण आहे. याबाबत कौशल म्हणाले, 'हिटलरने ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान एकूण २८वेळा शांततेचे आवाहन केले होते. 'आपला विरोध केवळ स्टॅलिन आणि त्याच्या साम्यवादाला असून, ब्रिटेनशी आपले काहीही वैर नाही. युरोपियन या नात्याने आपण भाऊ आहोत', असे आवाहन त्याने अनेकदा केले होते. यात त्याने केलेल्या अखेरच्या आवाहनाला फार महत्त्व आहे. जर्मनीने फ्रान्स आणि पोलंडला नमविले होते. त्यानंतर हिटलरने १९ जुलै १९४० रोजी राईचस्टॅग येथे जर्मन संसदेत भाषण केले. यात त्याने ब्रिटेनला शांततेचे अखेरचे आवाहन केले. हे आवाहन ब्रिटनने फेटाळल्यास युरोपचा सर्वनाश अटळ आहे, हेसुद्धा त्याने सांगितले होते. या भाषणाची छापील पत्रके त्याने एका बॉम्बर विमानाद्वारे ऑगस्ट १९४०मध्ये लंडन येथे फेकली होती. या पत्रकाची एक प्रत माझ्या संग्रहात असून, ती मी या प्रदर्शनात ठेवली आहे.'
आशुतोष हे मुळात आयटी इंजिनिअर असून आयटी पार्कमध्ये एका कंपनीत कार्यरत आहेत. दुसरे महायुद्ध आणि त्याचा अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेहून या पत्रकाची प्रत मागविल्याची माहिती त्यांनी दिली.
गांधींची विदेशी टपाल तिकिटे
या प्रदर्शनात शहरातील अनेक हौशी संग्राहकांनी भाग घेतला आहे. या प्रदर्शनातील विविध प्रकारची जुनी आणि नवी कंपासयंत्रे, कॅमेरे, विविध धातूंची जुनी भांडीकुंडी, जुनी आणि महत्त्वाची टपाल तिकीटे लक्ष वेधून घेतात. रूपकिशोर कनौजिया यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या १५० वर्षांच्या निमित्ताने काही विशेष टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. विविध देशांत गांधींच्या नावे छापण्यात आलेल्या टपाल तिकिटांचा हा संग्रह लक्ष वेधून घेतो. येथे असलेली मायक्रो खाटही विशेष आकर्षण ठरत आहे. टूथपिकपासून ती बनवली आहे. या आणि अशा अजबगजब वस्तूंची अधिक मजा अनुभवायची असेल, तर रामण विज्ञान केंद्र तातडीने गाठायलाच हवे. आज, रविवारी या नि:शुल्क प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.