म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
अकोला लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्यात यावी, असा अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केला आहे. त्यावर १५ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने यांनी खा. संजय धोत्रे यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर न्या. मनिष पितळे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, धोत्रे यांच्यावतीने अॅड. मुग्धा चांदूरकर यांनी हायकोर्टात अर्ज दाखल करून याचिकेच्या कायदेशीर मुद्द्यांवरच आक्षेप घेतला आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८१ नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या ४५ दिवसांच्या आत याचिका दाखल करणे आवश्यक आहे. लोकसभेचा निकाल २३ मे रोजी निकाल घोषित झाला होता. तर सुलताने यांनी सहा जुलै रोजी याचिका दाखल केली. तोवर ४५ दिवस पूर्ण झाले होते. त्यामुळे याचिका ही निर्धारित मुदतीच्या आत दाखल झालेली नाही.
निवडणूक याचिकेत धोत्रे यांनी गैरप्रकाराने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. परंतु, याचिकेत त्या आरोपांना सिद्ध करणारे कोणतेही पुरावे देण्यात आलेली नाहीत. तर याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोग यांनी गैरप्रकार केल्याने धोत्रे विजयी झाले असल्याचा दावा केला आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १०० (१)(ड) मधील तरतुदीनुसार विजयी उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे सबळ पुरावे अथवा साक्षीदार सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, याचिकेत तसे पुरावे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर याचिका ही निवडणूक याचिका होऊ शकत नाही, असे अर्जात नमूद केले आहे. त्यावर आता १५ नोव्हेबरला सुनावणी होणार आहे. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.