म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
बीए एलएलबी कोर्सच्या हयुमन राईट्स या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या चुकीच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना पाच गुण देण्याबाबतची शिफारस तज्ज्ञ समितीने नागपूर विद्यापीठाला केली आहे.
बीएएलएलबीच्या ह्युमन राईट्स या प्रश्नपत्रिकेत तब्बल २७ गुणांचे चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. सदर विषयाचा पेपर १५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्यात परीक्षा संचालक नीरज खटी, मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रमोद शर्मा आणि विषयतज्ज्ञांचा समावेश होता. तज्ज्ञ समितीने प्रश्नपत्रिका तपासून बघितली. तेव्हा त्यात केवळ पाच गुणांचेच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, असे आढळून आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या ए आणि बी सेक्शनमध्ये एकूण २७ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, असा दावा केला. त्यात जागितक आरोग्य संस्था, सुरक्षा परिषद, जनरल असेंब्ली, आंतरराष्ट्रीय न्यायाधीकरण यासारख्या मुद्यांचा समावेश होता. परंतु, तज्ज्ञ समितीला केवळ 'सार्क'बाबत विचारलेल्या संक्षिप्त टिप्पणीत दोष आढळून आला. त्यामुळे त्या प्रश्नासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पाच गुण बहाल करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, यावर्षी अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये दोष आढळून आला आहे. त्यात लॉ, बी.कॉम, आर्किटेक्चर यासारख्या कोर्सेसचा समावेश आहे. त्या कोर्सेसमधील प्रश्नपत्रिकांची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ समित्या स्थापन केल्या आहेत, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.