उज्ज्वलनगरात नागरिक रस्त्यावर; वाहतुकीचा खोळंबा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मुसळधार कोसळलेला पाऊस अन् विकासासासाठी सज्ज झालेले नागपूर यामधील पहिलाच संघर्ष रविवारी अनुभवयाला मिळाला. विकासकामांमुळे रोजच होणाऱ्या गैरसोयीत रविवारच्या या मुसळधार पावसाने भर घातली. मेट्रोच्या कामाने शहरातील रस्ते आधीच चिंचोळे झाले आहेत. या पावसामुळे तर ते जणू गायबच झाले. त्यामुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला. अनेक ठिकाणी रस्ते खचले तर कित्येक वस्त्यांतील घरांत पाणी शिरले.
उज्ज्वलनगरमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे नागरिकांच्या घरात पाणी साचले. रुग्णही घरात अडकून पडले. नागरिकांनी संतप्त होत रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली. नागरिक रस्त्यावर उतरल्याने वर्धा रोड काही काळासाठी जाम झाला होता. उज्ज्वलनगरात मेट्रोच्या कामामुळे पाइपलाइन यापूर्वी फुटली होती. ती रविवारी पुन्हा फुटली असल्याने घरांत पाणी घुसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
प्राइडसमोर खड्डा, खापरी जाम
हॉटेल प्राइडसमोर मोठा खड्डा पडला. त्यामुळे सायंकाळी वाहतूक विस्कळीत झाली. खापरीत जाम झाला. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. याबाबत कळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी खड्ड्याभोवती कठडे लावले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. अत्यंत सावधपणे या भागातून वाहने समोर सोडण्यात येत होती. वृत्त लिहिपर्यंत या मार्गावरील वाहतूक संथ होती.
नागरिक अंधारात
मेट्रोच्या कामामुळे महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांचे नुकसान होण्याचे प्रकार सुरू असताना आता उज्ज्वलनगर ते मनीषनगर या मार्गावर तयार होत असलेल्या अंडरपासच्या कामादरम्यान पुन्हा एकदा महावितरणच्या तीन फिडर्सचे नुकसान झाले आहे. यात उज्ज्वलनगर मैदानाच्या जुन्या भिंतीलगत असलेले रोहित्राचे पावसानंतर नुकसान झाले. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून उज्ज्वलनगर, कर्वेनगर आणि सोमलवाडा हा भाग रविवारी पहाटेपर्यंत अंधारात होता.
कर्वेनगरातील इमारतीला धोका
कर्वेनगर परिसरातील निवासी इमारतीच्या शेजारी असलेला फिडर पिलर कोसळल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेट्रोचे खोदकाम अर्धवट असल्याने त्यात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे माती वाहून गेली आहे. त्यामुळे इमारतीनाही धोका निर्माण झाला आहे.
वाहतूक बेस्याकडून वळविली
पावसामुळे मुख्यत्वे वर्धा मार्गावरील वाहतूक दुपारी बऱ्याच काळासाठी विस्कळित झाली होती. यामुळे नागरिकांनी वर्धा मार्गाच्या आसपासच्या शॉर्टकट्स आधार घेतला. वर्धा मार्गावरील वाहतूक बेसा-बेलतरोडीकडून वळविण्यात आली.
पावसाळ्यात करा सहकार्य!
पावसामुळे नागपूरकरांची गैरसोय होतेय, हे खरे आहे. मात्र, मेट्रोसारखी विकासकामेही आवश्यक आहेत. पावसाळ्याच्या या चार महिन्यांत नागपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.