आयुक्तांचे हायकोर्टासमोर मत
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
पारडी, वर्धमाननगर आणि मुंजे चौक येथे राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील रस्ते खराब होण्यास या दोन प्राधिकारणी जबाबदार आहेत, असे परखड मत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केले.
उपराजधानीतील रस्त्यांची झालेली चाळण आणि जीवघेण्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली. खड्ड्यांमुळे रस्ते अपघात वाढले असताना संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई का केली नाही, अशी विचारणा हायकोर्टाने महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांना केली.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी दाखल केलेल्या शपथपत्रात शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला महामेट्रो आणि एनएचआय कारणीभूत असल्याचे नमूद केले. पारडी, वर्धमाननगर आणि मुंजे चौक येथे मेट्रो व एनएचआयचे काम सुरू आहे. त्या कामांसाठी अत्यंत अवजड वाहने त्या रस्त्यांवरून जातात. परिणामी, रस्ते खराब झाले आहेत. अवजड वाहतुकीने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत, असे पत्र महापालिकेने वारंवार एनएचआय आणि महामेट्रोला पाठवले होते. परंतु, त्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्या भागातील रस्त्यांवर अपघात झाले असून नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे. तेव्हा महापालिकेनेच त्या रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे, असे शपथपत्रात नमूद केले आहे. महामेट्रो आणि एनएचआय यांच्या जड वाहनांमुळे रस्ते खराब झाले आहेत, त्यामुळे त्या रस्त्यांची डागडुजी आणि देखभाल करणे हे या दोन्ही प्राधिकारणींचे कर्तव्य आहे, असे आयुक्तांनी शपथपत्रात म्हटले आहे.