म.टा. प्रतिनिधी, नागपूर
संत्रानगरीतील तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता ही सर्वांत मोठी आरोग्य समस्या ठरत आहे. साधारणपणे २० टक्के तरुण हे तंबाखुमुळे तोंड आणि मानेच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. देशात १३ ते १५ वयोगटातील प्रत्येक दहा मुलांपैकी दोन मुले व प्रत्येका दहा मुलींपैकी एक तंबाखुमुळे मुख कर्करोगाच्या जोखमीवर उभी आहे. हे प्रमाण जसे शहरात आहे, तसेच ग्रामीण भागातही असल्याची चिंता, कान- नाक- घसा तज्ज्ञ डॉ. देवेंद्र माहोरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
असोसिएशन ऑफ ऑटोलिरिंगॉलॉजिस्ट ऑफ इंडियातर्फे कान-नाक-घसा रोग तज्ज्ञांची परिषद उपराजधानीतील चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. या परिषदेसाठी नागपुरात आले असता डॉ. माहोरे यांनी 'मटा'शी संवाद साधत या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधले. केवळ मुलांनाच तंबाखूचे व्यसन असते, हा गैरसमज खोडून काढत, डॉ. माहोरे म्हणाले, देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ४० टक्के घटनांमागे तंबाखू हे कारण असल्याचा धक्कादायक निष्कर्श देशपातळीवर केलेल्या पाहणीतून समोर आला होता. ग्रामीण भागाशी त्याची तुलना केली तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातही अशा आजाराची लक्षणे असलेल्या महिला आढळत आहेत. तरुण व मध्यम वयोपाटातील १२ ते १५ टक्के पुरुषांच्या दिवसाची सुरुवात सिगारेटच्या झुरक्याने होते. शहरातील ३५ टक्के तरुण हे कोणत्या ना कोणत्या तणावामुळे तंबाखूचे सेवन करतात. तंबाखू व धूम्रपानामुळे १८ टक्के तरुणांचे आयुष्यमान दहा वर्षांनी कमी होत आहे. ग्रामीण भागातील महिलादेखील मोठ्या प्रमाणात तंबाखूचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्यातही 'ओरल सबम्युकस फायब्रोसिस'चे प्रमाण वाढत आहे. या आजारात तोंडाचा जबडा पूर्णपणे उघडत नाही. मुखाच्या कर्करोगाची ही पायरी असते. शहरात तंबाखूचे सेवन करणाऱ्या दर १० पैकी २ जणांना याची लक्षणे आढळतात. ग्रामीण भागातल्या महिलांमध्येही दर १० पैकी एखादी स्त्री अशी समस्या घेऊन येत आहेत. हे प्रमाण कमी वाटत असले तरी ते चिंताजन आहे. महिलांमध्येही मुखाचा कर्करोग पाय पसरत असल्याचे हे संकेत आहेत. धोरणात्मक पातळीवर घेतलेल्या गुटखा बंदीच्या निर्णयाला तर काटेकोर, कडक अंमलबजावणीची जोड दिली नाही तर विदर्भ मुखाच्या कर्करोगाची राजधानी म्हणून पुढे येईल, अशी चिंतादेखील डॉ. माहोरे यांनी व्यक्त केली.