प्रवीण तोगडिया यांचा आरोप
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
'राममंदिराच्या मुद्द्यावरूनच भाजपला केंद्रात बहुमत मिळाले. मात्र, सत्ता मिळताच विचारधारा जाणीवपूर्वक दाबण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांनी हिंदूंचा विश्वासघात केला', असा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला.
राममंदिरासाठी संसदेत कायदा पारित करावा, यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून संमेलन आयोजित करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी 'चलो अयोध्या' असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी रेशीमबाग चौक येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात सभा घेतली. यावेळी पत्रपरिषद घेऊन आपली भूमिकाही मांडली. यावेळी संघ आणि भाजपवर कडक शब्दांत तोगडिया यांनी प्रहार केले.
भाजपच्या केवळ दोन जागा होत्या तेव्हा राममंदिराचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात आला होता. १९८४मध्ये राममंदिरासाठी आंदोलन करण्यात आले. रथयात्रा काढणे, प्रस्ताव तयार करणे असे विविध प्रयत्न झाले. मात्र, २०१४मध्ये सत्ता मिळताच भाजपने राममंदिराच्या मुद्द्याला बगल दिली. हा हिंदूंचा विश्वासघातच असल्याचे तोगडिया म्हणाले.
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत झालेल्या बैठकीत राममंदिर बनविण्याचे वेळापत्रकच तयार केले नाही. २०१७मध्ये भोपाळमध्ये भय्याजी जोशी यांनी 'संसदेत राममंदिरासाठी कायदा बनविण्याचा मुद्दा सोडून द्या', असे स्पष्ट केले. सत्ता मिळवून हिंदूंना मूर्ख बनविण्यात आले, असेही तोगडिया म्हणाले.
पूर्वी संघचालक, आता मोदी चालक!
'सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये बोलताना 'मंदिर झालेच पाहिजे', अशी भूमिका मांडली होती. डॉ. भागवत तुम्ही आता सत्तेत आहात, त्यामुळे मोदींना आदेश द्या. विजयदशमीपूर्वी कायदा करा', असे तोगडिया म्हणाले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी 'संघचालक' निर्णय घ्यायचे, आता 'मोदी चालक' निर्णय घेतात, अशी टीकाही तोगडिया यांनी केली.
काँग्रेस-भाजप नकोच!
'अब की बार मोदी सरकार नाही तर अब की बार हिंदुओ की सरकार', अशी घोषणा यावेळी तोगडिया यांनी केली. काँग्रेस-भाजपसोबत कधीच जाणार नाही, असे सांगताना इतर पर्याय खुले असल्याचेही तोगडिया म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासोबत विचारधारा जुळत असल्याचेही ते म्हणाले.