अ‍ॅपशहर

शाळांच्या सुरक्षेचे ‘ऑडिट’

नागपूर : राजधानी दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल येथील घटनेनंतर देशभरातील पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आपले पाल्य किती सुरक्षित आहेत याची चाचपणी पालकांनी सुरू केली आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 4:58 am
avinash.mahajan@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school security audit in nagpur
शाळांच्या सुरक्षेचे ‘ऑडिट’

Tweet : @avinashRMMT
नागपूर : राजधानी दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल येथील घटनेनंतर देशभरातील पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आपले पाल्य किती सुरक्षित आहेत याची चाचपणी पालकांनी सुरू केली आहे. उपराजधानी नागपुरात ‌रायनप्रमाणे घटना घडू नये यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेतली आहे. शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून पोलिस उपायुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना त्यांच्या भागातील शाळांच्या सुरक्षेचे अंकेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील घटनेनंतर नागपुरातील काही पालकांनी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क साधून सुरक्षेचे ‘ऑडिट’ करण्याची मागणी केली होती. पालकांची चिंता ओळखून अंकेक्षणाची मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिघोरीतील एका शाळेत स्नेहसंमेलनादरम्यान नृत्यशिक्षकाने विद्यार्थिनींना मारहाण केली होती. सीताबर्डी भागात ऑटोचालकाने एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पोलिस उपायुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना त्यांच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सर्वच शाळांची माहिती काढण्यास सांगण्यात आले आहे. त्या शाळेमध्ये किती शिक्षक व कर्मचारी आहेत. ते कुठे राहतात. स्कूलबस किती, त्यांचे चालक व वाहक कोण या सर्वांची चारित्र पडताळणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेचे ऑडिट झाल्यानंतर व चारित्र्य पडताळणीत संशयास्पद आढळलेल्या शिक्षक ,कर्मचारी,चालक व वाहकांचा अहवाल शाळा प्रशासनाला पाठवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
--

स्कूल बसचालकांची बैठक १५ला

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत स्कूल बसचालकांची १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सिव्हील लाइन्समधील पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे हे स्कूल बसचालक, मालक व वाहकांना मार्गदर्शन करतील. नागरिकही आपल्या सूचना देऊ शकतात.
--

चांगल्या व वाईट स्पर्शाची जाणीव हवी

पाल्यांना चांगल्या भावनेतून केलेला स्पर्श व वाईट भावनेतून केलेल्या स्पर्शाची जाणीव हवी. यासाठी शाळांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांचा एक तास घ्यावा. शाळेच्या वेळेत काय काय झाले, पाल्याने काय काय केले याची संपूर्ण माहिती पालकांनी पाल्यांना विचारावी. वाईट व चांगल्या स्पर्शाबाबत शाळा व्यवस्थापनाने विनंती केल्यास पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचीही तयारीही पोलिस आयुक्तांनी दर्शविली आहे.
--

पालकांनो, पुढील बाबींची माहिती घ्या

शाळेत सीसीटीव्ही आहे किंवा नाही

ते कोठे-कोठे आहेत?

सीसीटीव्ही सुरू आहे की बंद

हार्डडिस्कमध्ये दोन महिन्यांचा डाटा स्टोअर करण्याची क्षमता आहे किंवा नाही

शाळेतील कर्मचारी, शिक्षक ,चालक व वाहकांची चारित्र्य पतडताळणी झाले का?

आरटीओने परवानगी दिलेल्याच स्कूलबस, ऑटो विद्यार्थ्यांची ने आण करतात ‌किंवा नाही
--
विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पोलिस उपायुक्त व आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना शाळांच्या सुरक्षेचे अंकेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहा दिवसांत शाळांच्या सुरक्षेचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत.

- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज