म.टा. प्रतिनिधी, नागपूर
वाद्यवृंदांच्या अप्रतिम साथीने एकापेक्षा एक सरस गीते गावून सुरसप्तकच्या गायकांनी रसिकांची 'शाम' 'सिंदुरी' केली. अनोख्या संकल्पना घेवून कार्यक्रम सादर करण्याचे वैशिष्ट्य असलेल्या सुरसप्तकने येसुदास, एस. पी. बालसुब्रमण्यम व हरीहरन या दिग्गज दाक्षिणात्य गायकांच्या गीतांवर आधारित 'तु ही रे...' हा कार्यक्रम दमदारपणे सादर करत तिघांची गाणी एकत्रितपणे ऐकण्याची रसिकांची 'तमन्ना' पूर्ण केली.
फिल्मफेअर व अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त या गायकांनी गायलेल्या रागदारीवर आधारित गीते, हळुवार-तरल भावगीते, गजल व उडत्या चालींच्या एकल-युगल गीतांची निवड उत्तम होती. परिणामतः सुरसप्तकचे डॉ. अमोल कुळकर्णी, निसर्गराज, विजय देशपांडे, आशिष घाटे, अरूण ओझरकर, धीरज आटे, अभय व्यास, प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, रुचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, फाल्गुनी कुर्झेकर हे गायक रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. 'हाय रामा', 'जाब दीप जले आना', 'कभी तू छलिया', 'तु जो मेरे सुरमे', 'बाहो के दरम्या', 'आके तेरी बाहोमे हर श्याम लगे सिंदुरी', 'सुनयना', 'सुन बेलिया', 'बहोत प्यार करते है' अशा एकूण २६ लोकप्रिय सुरेल, रंगतदार गीतांचा स्वरानंद रसिकांनी लुटला. परिमल जोशी, पंकज यादव, विजय देशपांडे, आशिष घाटे, नंदू गोहाने, तुषार विघ्ने, रवी सातफळे, वेदांग जाधव ,मनोज विश्वकर्मा, आर्या देशपांडे या वादकांनी उत्तम साथसंगत केली.
दाक्षिणात्य दिग्गज त्रयींच्या गीतांची, स्वभावांची, लकबींची वैशिष्ट्ये सांगत त्यांच्या पुरस्कारांची माहिती देत श्वेता शेलगावकर यांनी आपल्या निवेदन शैलीने कार्यक्रम एका उंचीवर नेला. कार्यक्रमाला वैदर्भीय समाजसेवक अरविंद देशमुख व गुरुदेव महिला मंडळ रेशीमबागच्या संचालिका ममता बनसोड यांची विशेष उपस्थिती होती. पूर्वार्धाचे सूत्रसंचालन निसर्गराज यांनी केले. संकल्पना सुचित्रा कातरकर व निर्मिती पद्मजा सिन्हा, उज्ज्वला अंधारे यांची होती.