एलआयसी परीक्षेचा निकाल जाहीर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) असिस्टंट पदाच्या भरतीसाठी संपूर्ण देशभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये नागपूर विभागातून १ हजार ६५४ उमेदवार उत्तीर्ण झाले.
गेल्या चोवीस वर्षांपासून रखडलेली विमा क्षेत्रातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातून आठ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विमा क्षेत्रातील रखडलेल्या पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. त्यामध्ये हजारो उमेदवारांनी सहभाग नोंदविला. असिस्टंट क्लार्क या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुअरन्स वर्कर्स या आयुर्विमा महामंडळात कार्यरत कर्मचारी संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे इच्छुक उमेदवारांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन हवे असल्यास उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल देशपांडे, राकेश भूगावकर, उत्तम बोकडे, प्रसन्न वाघमारे, जयेश मेघल, मनोज जोशी आदींनी केले आहे.
मनुष्यबळ वाढणार
कर्मचारी बढती किंवा निवृत्तीमुळे मागील २४ वर्षांमध्ये वर्ग तीनची सुमारे २७ हजार पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत संपूर्ण देशभरात विमा कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख १० हजारांइतकी आहे. यातील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांची संख्या ५७ हजार, तर वर्ग एकचे कर्मचारी ३१ हजार आणि दोनचे कर्मचारी २२ हजार आहेत. वर्ग तीनमध्ये प्रामुख्याने लिपिकांचा समावेश होतो. विमा क्षेत्राच्या कामकाजाचा विस्तार पाहता लिपिकांची मोठ्या संख्येने गरज आहे. मात्र, रखडलेल्या पदभरतीमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. याबाबत विमा कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी सरकारला निवेदन दिले. तसेच आंदोलन, निदर्शने, धरणे आदींच्या माध्यमातून पदभरतीची मागणी रेटण्यात आली होती. अखेर दोन दशकानंतर ही भरती सुरू झाल्यामुळे विमा कार्यालयातील मनुष्यबळ वाढणार आहे.