म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
'ज्ञानेश्वरी' हा वाचण्याचा नव्हे, तर जगण्याचा ग्रंथ आहे आणि हेच जगण्याचे शिक्षण वारकरी संप्रदाय देतो, असे प्रतिपादन सुदगुरुदास महाराज यांनी केले. विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन स्वामीधाम बेसा येथे रविवारी सकाळी सदगुरुदास महाराज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भागवताचार्य श्रीराम महाराज जोशी होते. व्यासपीठावर अनिल महाराज अहेर, प्रमोद महाराज ठाकरे, स्वामी समर्थ आराधना पिरवारचे अध्यक्ष दिनकरराव कडू, पांडुरंग बारापात्रे महाराज उपस्थित होते.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना म्हणजे जवळपास दीड हजार वर्षे जुना संप्रदाय असल्याचे सांगून सदगुरुदास महाराज म्हणाले की, या संप्रदायाला ज्ञानदेवांनी नवसंजीवन दिले व संत तुकाराम या संप्रदायाचा कळस झालेत. ज्या काळात आपल्यावर परकीय आक्रमणे झाली, त्या काळात धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायानेच टिकवून ठेवली, असेही त्यांनी सांगितले.
कधी काळी 'वारकरी संप्रदाय हा गबाळ्यांचा, अशिक्षितांचा संप्रदाय आहे,' अशी टीका व्हायची. पण, हा निष्ठावंतांचा संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे म्हणत नाही, तर अवघाची संसार सुखाचा व्हावा म्हणून पांडुरंगाला साकडे घालतात, असे अनिल महाराज अहेर म्हणाले. प्रमोद महाराज ठाकरे म्हणाले की, फक्त वारकऱ्यासारखी वेशभूषा केल्याने किंवा कीर्तन करता आल्याने वारकरी होता येत नाही. वारकरी तत्त्वनिष्ठ असावा लागतो. वारकरी हा ज्ञानोबा-तुकोबाचा सेवक असतो.
आजचा सोहळा हा स्वामिधामसाठी आनंदोत्सव असल्याचे सांगून दिनकरराव कडू म्हणाले की, परोपकार हेच खरे अध्यात्म आहे. स्वामींनी माणसात देव पाहण्याची शिकवण दिली. त्यानुसारच स्वामिधामचे कार्य सुरू असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीप कोहळे यांनी प्रास्ताविक केले. स्वामिधाम बेसा येथील वारकरी शिक्षण संस्थेत हरीपाठ, गीता अभ्यास, अभंग, ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा हे आध्यात्मिक शिक्षण तसेच वारकरी भजन, शास्त्रोक्त गायन, मृदंग, टाळ, हार्मोनियम यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८ अशी येथील वेळ असून ७ वर्षांवरील स्त्री-पुरुष येथे प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश नि:शुल्क आहे, अशी माहिती कोहळे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाला संदीप ठाकरे, विलास जिल्हारे, नामदेवराव राऊत, जीवलगराव कोहळे आदी उपस्थित होते.