अ‍ॅपशहर

कथा नाटकाची

नाटकाप्रमाणे स्पष्ट दृश्ययोजना किंवा संवादांची नाट्यमयता कथेत नसते. दिग्दर्शकांना त्या दृश्याची, पात्राच्या मनात नेमके काय चाललेय याची कल्पना करावी लागते. सूत्रधार गोष्टीला समोर नेत असताना पात्रांच्या माध्यमातून दृश्य तयार होत जातात.

Maharashtra Times 26 Aug 2017, 4:00 am
एखाद्या लेखकाचा मृत्यू हा त्याचा शेवट नसतो. त्याने निर्मिलेली चरित्रे, पात्र त्याला कायम जिवंत ठेवत असतात. एखाद्या चरित्राच्या सर्व पैलूंना उजागर करून त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचे काम हा लेखक कथेद्वारे करत असतो आणि म्हणूनच आपण त्या चरित्रांना चांगल्यारितीने समजू शकतो. कदाचित वास्तविक जीवनात आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर इतक्या चांगल्या रितीने समजू शकलो असतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम story of drama rupesh pawar column
कथा नाटकाची


प्रत्येक व्यक्तीचे स्वत:च एक भावविश्व असते. जीवनानुभव असतो. त्या भावविश्वाला लेखक कागदावर उतरवत असतो. त्यातूनच मग कथा किंवा गोष्ट जन्माला येते. अशाच काही अनुभवांना घेऊन मीदेखील नाटके लिहिली आणि त्यांचे सादरीकरण केले. या दरम्यान सआदत हसन मंटो, मुंशी प्रेमचंद, इस्मत चुगताई, महाश्वेता देवी, उदय प्रकाश या साहित्यिकांची पुस्तके वाचता आली. त्यांच्या कथा वाचत असताना एका नव्या भावविश्वात प्रवेश करता झालो. कथांमध्ये यथार्थता होती, परिपूर्णता होती. या कथा इतक्या सक्षम होत्या की, त्या वाचताना ते प्रसंग जणू डोळ्यांसमोर घडत आहेत, असा भास व्हायचा. कथांमधले प्रत्येक चरित्र विचार करायला भाग पाडायचे. मंटोंची ‘टोबा टेकसिंग’, मुंशी प्रेमचंदांची ‘कफन’, ‘बडे भाईसाहब’ असो की मग महाश्वेतादेवींची ‘बीज’ किंवा उदय प्रकाश यांच्या ‘मोहनदास’, ‘तिरीछ’, ‘छप्पन तोले का करधन’ या कथा असोत, त्यातील प्रत्येक चरित्राने माझ्यासमोर एक नवे भावविश्व खुले केले. या कथांमधून मला जो अनुभव मिळाला तो सर्वांसोबत शेअर करता यावा म्हणून त्या कथांना रंगमंचावर आणले.

नाटकाच्या परंपेरची सुरुवातही कदाचित अशीच कोणतीतरी घटना सांगून झालेली असावी. म्हणजे कोण्या एका व्यक्तीने त्याच्या सोबत घडलेली एखादी घटना लोकांना सांगितली असणार आणि ऐकणाऱ्यांना ती फारच आवडली असणार. नंतर चार लोकांनी या घटनेला किस्से, कहाणीच्या रूपात इतरांना ऐकवले आणि जेव्हा मनोरंजनासाठी कथेचे सादरीकरण होऊ लागले, तेव्हा सूत्रधाराचा जन्म झाला आणि पात्र आलीत. आपल्या पौराणिक नाटक आणि लोकनाट्यांमध्येही हेच दिसते, की पात्र दृश्यरूप दाखवतो आणि सूत्रधार गोष्टीला पुढे नेत असतो. कथेला रंगमंचावर आणताना तिच्या अंतर्गत विणीतून निर्माण झालेल्या दृश्यांना अधिक ठळकपणे दाखवावे लागते.

नाटकाप्रमाणे स्पष्ट दृश्ययोजना किंवा संवादांची नाट्यमयता कथेत नसते. दिग्दर्शकांना त्या दृश्याची, पात्राच्या मनात नेमके काय चाललेय याची कल्पना करावी लागते. सूत्रधार गोष्टीला समोर नेत असताना पात्रांच्या माध्यमातून दृश्य तयार होत जातात. कधी अभिनेता पात्राच्या भूमिकेतून बाहेर पडून सूत्रधार बनतो व पात्राच्या मनात काय चाललेय हे थेट संवादातून लोकांना सांगतो नंतर तो परत पात्र बनून जातो. मंचावर जे बघतोय ते नाटक आहे; वास्तव नाही याची सतत जाणीव प्रेक्षकांना करून देणे हे सूत्रधाराचे काम आहे. तो वेळावेळी नाटकाच्या बाहेर पडून मंचावर असलेल्या काल्पनिक भिंतीला तोडून प्रेक्षकांशी थेट संवाद साधत असतो. अशी धारणा आहे की, सूत्रधार आपले संवाद म्हणेल आणि प्रेक्षक त्या संवादाद्वारे एक दृश्य आपल्या मनात तयार करेल.

आधुनिक नाटकांमध्ये सूत्रधाराच्या अंगाने अनेक प्रयोग झालेत. ‘बडे भाईसाहब’ या कथेचे मराठी नाट्यरूपांतरण मी ‘ताई’ या नावाने केले. यात मुख्य भूमिकेतील ताईला सोडून बाकी सर्व सहा पात्र आपआपल्या भूमिकांमध्ये राहून प्रेक्षकांना कथा सांगतात. तेच ‘टोबा टेकसिंग’ या कथेच्या रंगमंचीय सादरीकरणात खुर्च्यांच्या माध्यमातून नाटकाची कथा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तेच ‘लायसेन्स’ आणि ‘पोस्टमास्टर’ या कथांचे नाट्यरूपांतरण करताना सूत्रधाराची भूमिका पूर्णपणे बाजूला ठेवून कथेला केवळ दृश्य रूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज