नागपूर : पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतही अलर्ट घोषित करण्यात आला असून, संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांना पार्किंगमधील वाहने तसेच मोकळ्या जागेवरील बेवारस वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील व शहराबाहेरील प्रत्येक लॉज व हॉटेलची कसून तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय, नाक्यावरही तपासणी सुरू आहे. संशयास्पद परिस्थितीत कोणी आढळल्यास त्वरित ताब्यात घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे व बसस्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. नाकेबंदी करून संशयास्पद व्यक्ती व वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.
उपराजधानीत अलर्ट घोषित
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतही अलर्ट घोषित करण्यात आला असून, संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे...
30 15 Feb 2019, 4:00 am