गरिबांची दिवाळी होणार गोड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने रास्त भाव दुकानामार्फत सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत उपलब्ध होईल. याचबरोबर शहरातील ४० हजार कुटुंबांना ऐन दिवाळीत ४०० क्विंटल शिल्लक साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना साखर वितरित करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नागपूर (ग्रामीण) भागासाठी १ हजार ६८३ क्विंटल साखरेचे नियतन करण्यात आले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिमाहीसाठी साखरेचे नियतन प्राप्त झाले असून रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी केले आहे.
अंत्योदय योजनेंतर्गत नागपूर शहरातील ४० हजार कुटुंबे लाभ घेत आहेत. या कुटुंबांसाठी १२०० क्विंटल साखर येणार आहे. याचबरोबर ४०० क्विंटल साखर शिल्लक आहे. ही शिल्लक साखर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात वाटण्यात येईल. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला १ किलो नाही तर दीड किलो साखर मिळणार आहे.
आम्हालाही हवी साखर…!
सध्या केवळ अंत्योदय कार्डधारकांनाच स्वस्त साखर दिली जाते. बीपीएल कार्डधारकांनाही साखर, चनाडाळ देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात २४०० क्विंटर साखर स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना दिली जात होती. आता ४०० क्विंटल साखरच दिली जाते. व्यक्तीमागे किमान ५०० ग्रॅम साखर मिळाली तर कुटुंबात चार सदस्य असेल तर दोन किलो साखर मिळेल. वाढत्या महागाईत गरिबांना या स्वस्त धान्य दुकानांचाच मोठा आधार असतो. बीपीएल कार्डधारकांनाही ही साखर मिळाली तर आमची दिवाळीही गोड होईल, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.