म. टा. प्रतिनिधी, नागपूर
'पाकिस्तानने भारताची प्रतिमा ही फक्त बचावाची भूमिका घेणारा देश, अशी केली होती. आपणही फार फार तर क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घ्यायचो आणि शांत व्हायचो. मात्र, वेळप्रसंगी सडेतोड उत्तर देण्याची भारतीय सैन्याची तयारी असते, हा संदेश सर्जिकल स्ट्राइकमधून देण्यात आला,' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांनी गुरुवारी केले.
प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'प्रहरीं'ना ते संबोधित करत होते. कार्यक्रमाला मेजर जनरल (निवृत्त) अनिल बाम, प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे, विश्वस्त फ्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे, मुख्याध्यापिका शुभा मोहगावकर उपस्थित होत्या.
निंभोरकर म्हणाले की,'वेळ पडल्यास भारत सीमापार जाऊन विजयी चढाई करू शकतो, असा इशारा सर्जिकल स्ट्राइक करून भारताने पाकिस्तानला दिला. याला दोन वर्षे झाल्यावरही भारतीय सेना दलाच्या या कारवाईवर देशभरातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. म्यानमारचे सर्जिकल स्ट्राइक झाल्यावर भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केलेली दिसते. त्यामुळे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केल्याची घटना जाहीर करणे गरजेचे होते. भारत चढाई करण्याची रणनीती यशस्वीपणे वापरू शकतो, हे सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताने स्पष्ट केले.' पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 'सर्जिकल स्ट्राइकची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली. तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका आठवड्यात सर्व तयारी करण्यास सांगितले होते. मी सैनिकांसोबत चर्चा केली होती. मात्र, त्यांना जागेची माहिती दिली नव्हती. सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या एक दिवस आधी त्यांना कळले होते'. सर्जिकल स्ट्राइकसंबंधी सांगताना त्यांनी सांगितले की, 'आम्ही दहशतवादी तळांची माहिती मिळवली होती. आम्ही त्यांच्या वेळेचा अभ्यास केला आणि हल्ल्यासाठी पहाटे ३.३० ची वेळ अगदी योग्य असल्याचे लक्षात आले. त्याआधी आमचे सैनिक सुरक्षितस्थळी पोहोचले होते. अडथळे पार करत ते पोहोचले होते. त्यांनी तीन दहशतवादी तळ नष्ट केले तसेच २९ दहशतवाद्यांचा खात्मा केला.'
हवाई दलाचा वापर नं करणे चूक
कारगिल युद्धामध्ये हवाई दलाचा वापर नं करणे, ही भारताची सर्वांत मोठी चूक होती. भारताचे हवाई दल सुसज्ज आणि अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. त्यावेळी हवाई दलाचा वापर करण्यात आला असता, तर कदाचित युद्धाचे स्वरुप वेगळे राहिले असते, अशी माहिती निंभोरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. याप्रसंगी त्यांनी दिवंगत मनोहर पर्रीकर हे सर्वोत्कृष्ट संरक्षणमंत्री होते, असा गौरवोल्लेख केला.
....................