म.टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन अग्निशमन स्थानकांची आवश्यकता आहे. झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथे नवीन अग्निशमन स्थानक बांधण्याबाबत शहर विकास आराखड्यात जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक वर्ष लोटूनही या जागा ताब्यात घेण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने विषयासंदर्भात गांभीर्य दाखवून ३१ ऑगस्टपर्यंत यासंबंधी अहवाल सादर करावा, असे निर्देश अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी दिले.
अग्निशमन समितीच्या सोमवारी स्थायी समिती सभागृहात ही बैठक झाली. बैठकीत स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अग्निशमन समितीचे उपसभापती निशांत गांधी, सदस्य संदीप गवई, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अधिकारी बी.पी. चंदनखेडे, सहायक केंद्र अधिकारी केशव कोठे, सुनील राऊत आदी अग्निशमन स्थानकांचे स्थानकाधिकारी उपस्थित होते.
ॲड. बालपांडे म्हणाले, नागपूर शहरात २५ अग्निशमन स्थानकांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ आठ स्थानक कार्यरत आहेत. स्थानकांची संख्या वाढविण्यासाठी शहर विकास आराखड्यात काही ठिकाणी जागाही आरक्षित करण्यात आल्या आहेत. झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथे अग्निशमन स्थानकाकरिता २००१ मध्ये शहर विकास आराखड्यात आरक्षण मंजूर करण्यात आली. मात्र एवढे वर्ष लोटूनही जागा ताब्यात घेण्याबाबत स्थावर विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, याबाबत अग्निशमन समिती सभापतींनी नाराजी दर्शविली.
आरक्षित जागा मनपाच्या ताब्यात घेण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. यात येणारे अडथळे दूर करून आरक्षणाची मुदत संपण्याबाआधी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करणे व याबाबतचा अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत समितीकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिली. नव्याने बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती नगर अग्निशमन स्थानकाचे उद्घाटन करण्याची तारीख निश्चित करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट व पाचपावली या स्थानकांची पुनर्बांधकाम करणे, राठोड ले-आउट येथील अग्निशमन स्थानकासाठी जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, नागपूर शहरामध्ये नवीन ११६ हायन्ड्रटची निर्मिती करणे आदी विषयावरही चर्चा करण्यात आली.
अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा'
अग्निशमन समिती ही महानगरपालिकेतील संवैधानिक समिती आहे. बैठकीमध्ये स्थावर विभागाशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र स्थावर विभागातील अधिकारी अथवा विभागाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हते. त्यावर सभापती ॲड. बालपांडे यांनी नाराजी दर्शवित स्थावर विभागाच्या अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.