अ‍ॅपशहर

शिक्षकांनो, सामाजिक बांधिलकी जपा!

शिक्षकांमध्ये विविध गुण आहेत. त्यांच्यामध्ये कलेचा आस्वाद घेण्याची प्रतिभा असली तरच ते प्रतिभावान व क्षमतावान असलेली दुसरी पिढी निर्माण करू शकतील. नोकरीसोबत सर्व काही मिळालेल्या शिक्षकाने समाजाकडे मागे वळू पाहिले पाहिजे. आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

Maharashtra Times 26 Feb 2018, 9:18 am
प्रतिभाताई पाटील साहित्यनगरी, कारंजा (जि. वाशीम)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers social commitment
शिक्षकांनो, सामाजिक बांधिलकी जपा!


शिक्षकांमध्ये विविध गुण आहेत. त्यांना वाव मिळाला पाहिजे. त्यांच्यामध्ये कलेचा आस्वाद घेण्याची प्रतिभा असली तरच ते प्रतिभावान व क्षमतावान असलेली दुसरी पिढी निर्माण करू शकतील. नोकरीसोबत सर्व काही मिळालेल्या शिक्षकाने समाजाकडे मागे वळू पाहिले पाहिजे. आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

कारंजा येथील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरी विद्याभारती महाविद्यालय परिसरात शिक्षक साहित्य संघाच्यावतीने सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटक म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शोभा रोकडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत तर प्रमुख अतिथी म्हणून संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर, सचिव राजेश सातव, अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोजहारे, प्रा. डॉ. श्रीकांत तिडके (मूर्तीजापूर), शैलेश काळे (अमरावती), प्रा. हेमंत खडके, प्राचार्य डॉ. सुदाम गवई, विलास मराठे आदींची उपस्थिती होती.

मराठी भाषेला राजाश्रय मिळाला तरच संगोपन व संवर्धन होईल, असे मत वरिष्ठ पत्रकार संदीप भारंबे यांनी व्यक्त केले. 'मराठी भाषेचे संवर्धन व संगोपन' या विषयाच्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिसंवादात प्रा. अरुण बुंदेले, प्रा. चंद्रशेखर धुरकंपट्टे, प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, प्रा. ताराचंद कंठाळे, प्रा. विलास इंगळे आदी उपस्थित होते. संमेलनादरम्यान अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित काव्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष व साहित्यिकांचा सत्कारही करण्यात आला.

संचालन सुरेश मडावी यांनी केले. रामकृष्ण गावंडे यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदनेने संमेलनाचा समारोप झाला.

मराठीला मिळावा 'अभिजात' दर्जा

मराठी भाषेला 'अभिजात'चा दर्जा मिळावा, शिक्षक साहित्य संघाला अनुदान मिळावे, संमेलनासाठी पाच दिवसांची विशेष रजा सरकारने मंजूर करावी हे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज