म.टा.प्रतिनिधी, नागपूर
पर्यावरणपूरक विसर्जनाच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत सुमारे अडीच लाख नागरिकांनी कृत्रिम तलावात यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मात्र, अनेक भक्तांमध्ये आपली मूर्ती पीओपीची की मातीची, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. विसर्जन केल्यानंतर मातीची म्हणून सांगितलेली मूर्ती पाण्यावर तरंगू लागल्याने अनेक भक्तांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळांवर मातीच्या मूर्तींबाबतचे खोटे दावे उघडकीस आल्याचे प्रकार घडले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूरकरांनी यंदा उत्स्फूर्त दाद दिली. मातीच्या मूर्ती खरेदी करणे आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणे या दोन्हींना नागरिकांनी पसंती दिली. मात्र, मातीची सांगून पीओपीची मूर्ती भक्तांना विकल्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले आहेत. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मदत करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांनी भक्तांच्या या फसवणुकीचे दाखले दिले आहेत.
'पर्यावरणपूरक मूर्ती आणि विसर्जन या दोन्हींना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. विसर्जनाच्या अंतिम दिवशी फुटाळ्यावरील आठही कृत्रिम तलाव पूर्ण भरले होते. २०१३ला या उपक्रमांची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच हे घडले आहे. मात्र, पीओपीच्या मूर्तींबद्दलच्या अनभिज्ञतेमुळे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. अनेक मूर्तींच्या पाठीवर लाल ठिपका लावण्यात आला नव्हता. त्यामुळे, आपली मूर्ती पीओपीची आहे यावर विश्वास ठेवायला नागरिक तयार नव्हते. विसर्जन केल्यानंतर मूर्ती पाण्यावर तरंगायला लागल्यानंतर त्यांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. यामुळे, अनेक भक्तांचा विरसही झाला', असे ग्रीन व्हिजिल संघटनेचे कौस्तव चॅटर्जी यांनी सांगितले.
फुटाळ्याच्या मध्यभागीही विसर्जन
गणेशमूर्तींचे विसर्जन तलावाच्या काठावर व्हावे, यावर प्रशासनाने कटाक्ष दिला होता. असे असतानाही फुटाळा तलावात आतपर्यंत बोटीने गणेशमूर्ती नेऊन तेथे विसर्जन करण्याचेही प्रकार झाले. प्रत्येक मूर्तीमागे १०० रुपये शुल्क आकारून काही तरुण हे विसर्जन घडवून आणत होते. त्यांना थांबविणारे कुणीही नव्हते, अशी माहिती स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी दिली. काठावर विसर्जन झाल्यास विघटित मूर्ती आणि कचरा साफ करणे महापालिका प्रशासनाला सोपे जाते. मात्र, आतल्या भागात झालेल्या या विसर्जनाने या मूर्ती दीर्घकाळपर्यंत तलावात राहणार आहेत.
पीओपीचा केला जाणार पुनर्वापर
रामनगर येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुमारे ४ हजार मूर्तींचे या तलावात विसर्जन करण्यात आले. या मूर्तींच्या विघटनातून मिळणाऱ्या पीओपीवर प्रक्रिया करण्याचा प्रयोग यंदा केला जाणार आहे. भंगलेल्या मूर्तींना पावडर स्वरूपात आणले जाईल. या पीओपीवर प्रक्रिया केली जाईल आणि ही पावडर मूर्तिकारांना देण्यात येईल. असा प्रयोग पहिल्यांदाचा केला जाणार आहे. याशिवाय, मूर्तींचा रंगही ब्लिचिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात काढला जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो नागपूरव्यतिरिक्त इतर ठिकाणीदेखील लाभदायक ठरणार आहे, असे इकोफ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी सांगितले.
जागरुकतेला अजूनही 'स्कोप'
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यावरणपूरक विसर्जनाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. मात्र, तलावांच्या काठावर जमा झालेला कचराही बराच होता. तो साफ करताना महापालिकेने केलेले काम कौतुकास्पद होते. मात्र, नागरिकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जागृती करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गरज स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दूधभादे यांनी व्यक्त केली.