Mandar.Moroney@timesgroup.com
Tweet : @MandarMoroneyMT
नागपूर : दरवर्षी लक्षावधी रुपयांमध्ये होणारे शालेय पाठ्यपुस्तकांचे व्यवहार यंदा करोना लॉकडाउनमुळे अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत. यंदाच्या शालेय सत्राच्या प्रारंभाबद्दल अजून काहीही स्पष्ट कल्पना येत नसल्याने शाळा आणि प्रकाशक यांच्यातील पाठ्यपुस्तकांच्या व्यवहाराला मोठी खीळ बसली आहे.
शहरातील अनेक राज्य मंडळांच्या तसेच सीबीएसईच्या शाळा खासगी पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तकांची खरेदी करतात. बाल भारती आणि एनसीईआरटी यांच्या जोडीने खासगी प्रकाशकांची पुस्तकेदेखील वापरली जातात. याशिवाय एक शाळा सगळी पुस्तके एकाच प्रकाशन कंपनीकड्न घेत नाही. विविध वर्गांची आणि विषयांची पुस्तके पुरविणाऱ्या निरनिराळ्या कंपन्यांशी शाळांचे पुस्तकांचे व्यवहार होत असतात.
दरवर्षी एप्रिल महिन्यात शाळा संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत शाळा आणि प्रकाशक यांच्यातील व्यवहार पूर्ण होतात. मात्र यंदा मार्चमध्ये सर्व शाळा बंद झाल्या आणि लॉकडाउनमुळे नेहमीप्रमाणे पुस्तक खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत. अनेक शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात पुस्तके घेतलेली नाही. लॉकडाउनमुळे किती पालक घराबाहेर पडून पुस्तके घ्यायला येतील, याची खात्री नसल्याने मोठ्या संख्येने पुस्तके खरेदी करून ठेवण्याचे शाळांनी टाळल्याचे चित्र नागपुरात आहे. बहुतांश सर्व प्रकाशन कंपन्यांची गोदामे ही महाराष्ट्र, नवी दिल्ली, बेंगळुरू अशा शहरांमध्ये आहेत. सध्या सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने पुस्तकांची वाहतूकही अडचणीत आली आहे. लॉकडाउनने निर्माण केलेल्या अडचणींमुळे पाठ्यपुस्तकांच्या व्यवहाराचा संपूर्ण मोसम अडचणीत आला आहे.
प्रकाशकांकडून 'ऑनलाइन कंटेंट'
अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यासाठी, ऑनलाइन अभ्यास साहित्य वापरले जाते आहे. बऱ्याच शाळांनी एनसीईआरटीच्या साहित्याला पसंती दिली आहे. मात्र त्याच जोडीने खासगी प्रकाशक संस्थांनीही शाळांना डिजिटल कंटेंट उपलब्ध करून दिल आहे. यामध्ये, विविध विषयांच्या लिंक्स तसेच अॅप्सचाही समावेश आहे.
प्रवेशच नाहीत, पुस्तकांचे काय?
नव्या सत्रातील प्रवेशांबाबतही शाळांमध्ये चिंतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. विशेषत: प्ले-ग्रुप, नर्सरी आणि केजीच्या वर्गांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. पहिली आणि त्यावरील वर्गांचे प्रवेशही अद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाहीत. त्यामुळे, पाठ्यपुस्तकांची आगाऊ नोंदणी कशी आणि किती करावी या बाबत शाळा संभ्रमात आहेत.
गर्दीबाबत अनेकांना चिंता
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके दिली जातात. यंदा पाठयपुस्तके घेण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होऊ द्यायची किंवा नाही असा प्रश्न शाळांसमोर असेल. त्याऐवजी थेट दुकानांमधूनच विद्यार्थ्यांना खरेदी करायला सांगितले जाण्याची शक्यता आहे. पुस्तकांच्या खरेदीत शाळा आणि प्रकाशक यांचा आर्थिक व्यवहार चालतो. या व्यवहाराची गणितेही यंदा काही प्रमाणात बदलतील असे सांगितले जाते आहे.
पालकांनाही धास्ती
पाठ्यपुस्तके मिळतील की नाही हीदेखील भीती पालक, विद्यार्थी आणि शाळांना भेडसावत आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम स्थानिक प्रकाशन कंपन्यांवर होणार असून नोकऱ्यामध्ये कपातीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागू शकते, अशी शंका प्रकाशन कंपन्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान अद्यापही काही शाळांची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. अनेक शाळांचे निकालही लागायचे आहेत.