म. टा. वृत्तसेवा, भंडारा
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून असलेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे गोसेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी बावनथडीत अजूनही शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द व बावनथडी हे दोन प्रमुख सिंचन प्रकल्प आहेत. दमदार पाऊस कोसळण्यापूर्वी दोन्ही प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त जलसाठा होता. या पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पात ३८.३८ टक्के उपयुक्त जलसाठा तयार झाला आहे. तर बावनथडी प्रकल्प अजूनही कोरडा आहे. त्यामुळे बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात मोठे, मध्यम व लघु असे मिळून ३८४ धरण आहेत. या धरणांमध्ये २०५६.७८ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी २४.०४ इतकी आहे. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे.
जुलै महिन्याच्या प्रारंभी संततधार कोसळणाऱ्या पावसाने नंतर दडी मारली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु, त्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर होते. तथापि, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतशिवारात पावसाचे पाणी जमा झाले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.