नागपूर : स्क्रब टायफसने होत असलेले मृत्युसत्र गेल्या पंधरा दिवसापासून थांबेनासे झाले आहे. या आजाराने रोज किमान एकाचा मृत्यू होत आहे. उपचारादरम्यान आणखी एक रुग्ण शनिवारी दगावला. त्यामुळे मृतांचा आकडा आता १६वर पोहोचला आहे. या घडामोडीत आणखी रुग्ण विदर्भात विविध ठिकाणी व्हेंटिलेटरवर आहेत. संपूर्ण विभागात या आजाराची दहशत असल्याने आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह लागले आहे. स्क्रब टायफसवर उपचारासाठी आरोग्य विभागाकडे औषधीच उपलब्ध नसल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभाग सांगत आहे. रुग्णांना अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये दाखल करण्यात येत असल्याने मृत्यूचा आकडा फुगत आहे. ओरियंटा सुतसुगामुशी नामक जिवाणूच्या संक्रमणामुळे होणाऱ्या या आजाराचे तातडीने निदान झाले तर औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासनाने गंभीरतेने या आजारासंदर्भात दखल घेतली नाही. कागदोपत्री दखल घेण्यात आली आहे, मात्र दगावलेल्या प्रत्यक्षात उपचारासाठी कोणतीही उपाययोजना तातडीने होत नसल्याची खंत रुग्णांच्या नातेवाईक बोलून दाखवत आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दगावलेल्या मृतकाचे नाव अमोल मंडल असे आहे. गडचिरोली येथील अमोल यांना अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते. स्क्रब टायफसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार स्क्रब टायफसग्रस्तांची संख्या ९० वर पोचली आहे. मात्र विभागाकडे यंत्रणा नसल्याची बाब समोर येत आहे. उपसंचालकांपासून ते सर्वजण केवळ आकडेवारी नोंदविण्यात धन्यता मानत आहेत. तर मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात सद्या ५०पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
स्क्रब टायफसचे मृत्युसत्र सुरूच
स्क्रब टायफसने होत असलेले मृत्युसत्र गेल्या पंधरा दिवसापासून थांबेनासे झाले आहे या आजाराने रोज किमान एकाचा मृत्यू होत आहे...
Maharashtra Times 9 Sep 2018, 4:00 am