-बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील हृदद्रावक घटना
म.टा. प्रतिनिधी, बुलडाणा
विहिरीजवळ काम करीत असताना दहा वर्षीय मुलगा तोल जावून विहिरीत पडला. त्याचक्षणी त्याला वाचविण्याकरिता वडिलांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहणे येत नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वरवंड येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अरुण इंगळे (वय ५०) व संघर्ष (वय १०), अशी मृत बापलेकांची नावे आहेत.
तालुक्यातील वरवंड येथील निवृत्त पोलीस पाटील साहेबराव इंगळे यांचा मुलगा अरुण इंगळे हे शेती करतात. गुरुवारी सकाळी ते दहा वर्षीय मुलगा संघर्ष आणि चार वर्षीय मुलगा तुषार यांना सोबत घेऊन शेतावर गेले होते. शेतात बांधलेली विहीर आहे. या विहिरीला कठडेदेखील होते. मात्र, विहिरीतील खरप (पाषाणाचे फोडलेले दगड, मुरुम) बाजूलाच टाकलेला असल्याने तो भाग कठड्यापर्यंत उंच झाला होता. विहिरीच्या जवळपासच अरुण इंगळे काम करीत होते. यावेळी खरपाजवळ असलेला संघर्ष हा तोल जावून विहिरीत पडला. मुलगा पडताच त्याला वाचविण्यासाठी वडील अरुण यांनीही विहिरीत उडी घेतली. परंतु, त्या दोघांनाही पोहोता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. हे थरार दृश्य पाहून घाबरलेला चार वर्षीय लहान मुलगा तुषार हा ही घटना सांगण्यासाठी गावाकडे धावत गेला. त्याचवेळी त्याचे काका रस्त्याने येत असताना त्याने भांबावलेल्या अवस्थेत संघर्षदादा विहिरीत पडला व पप्पाने विहिरीत उडी घेतल्याचे सांगितले.
ही घटना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही जणांनी विहिरीत उड्या घेऊन शोधाशोध सुरू केली. मात्र, यश आले नाही. अखेर गळ टाकून पाहिले असता दोघांचेही मृतदेह अडकून बाहेर आले. संघर्ष आणि अरुण यांना ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बापलेकांच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गुरुवारी संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण होते.