म. टा. प्रतिनिधी,नागपूर
लहान बालकांमध्ये जिज्ञासा असते आणि ते सारखे प्रश्न विचारत असतात. त्यांच्या मनात शिकण्याची इच्छा असते. जोपर्यंत व्यक्तीच्या मनात शिकण्याची बुद्धी असते तोपर्यंत त्याच्या मनात देव असतो. मात्र, अशा बालकांना गप्प केले जाते आणि बऱ्याचदा हे काम घरोघरच्या वडिलांकडून केले जाते. याशिवाय, सत्ताधाऱ्यांनादेखील 'चूप बैठो' असे म्हणण्याची सवय असते, असा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान मारला.
चिटणवीस सेंटर येथे साऊथ पॉइंट शाळेच्या वतीने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटन समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'सुपर ३०' चळवळीचे जनक आनंद कुमार, ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, सनफ्लॉवर आणि तायची प्रकाशनाचे प्रमुख राजेश घई, शिक्षणतज्ज्ञ नीरू कपाई, आभा मेघे, मुक्ता चॅटर्जी, प्रकाश सोमलवार, साऊथ पॉइंट शाळेचे प्रमुख देवेन दस्तुरे, डॉ. मृणालिनी दस्तुरे यांच्यासह विविध शाळांचे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षणातून विकसित मनुष्य तयार होणे गरजेचे आहे. केवळ स्वत:चा विचार करू शकणारा मनुष्य विकसित असू शकत नाही. विद्यार्थ्यांची आपल्यापलीकडे जाण्याची संवेदनशीलता जेवढी विकसित होत जाईल, तेवढा त्याचा विकास होत जाईल. असा जाणीवा विकसित झालेला, आनंदाने भरलेला आणि इतरांचा विचार करणारा उपकारी विद्यार्थी तयार करण्याचे काम शिक्षणातून घडावे. त्यातूनच महान व्यक्ती घडविण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात येऊ शकेल, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले. कोणताही सामान्य मनुष्य महान बनू शकतो. मात्र, त्यासाठी तशी स्वप्ने बघणे व त्याकरिता मन तयार करणे आवश्यक आहे. माणसाचा देव व्हावा की राक्षस, याची दिशा शिक्षणातून मिळायला हवी. निसर्गाचा ऱ्हास, आपसांतील भांडणे आणि केवळ स्वार्थ बघणे हे चुकीचे आहे हे माहिती असूनही सगळे जण तेच करीत असतात. बुद्धी सत्यानुसार चालावी आणि सत्याचा स्वीकार करायला व्यक्ती शिकावी. मी आणि माझे यापलीकडे जाऊन व्यक्तीला विचार करता येईल, अशा प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणे आवश्यक आहे, असे मत डॉ. भागवत यांनी मांडले.
'सर' ऐकले तोच मोठा क्षण
आनंद कुमार यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. सातव्या वर्गात असताना मला तिसरी आणि चौथीच्या मुलांना शिकविण्याची संधी मिळाली. त्या मुलांनी मला 'प्रणाम सर' अशी हाक मारली आणि तो माझा आयुष्यातील आजवरचा सर्वांत महत्त्वाचा क्षण आहे. मी इंजिनीअर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. मात्र, माझे गुरू देवीप्रसाद वर्मा यांनी माझ्या वडिलांना मला शिक्षक होऊ देण्याचा सल्ला दिला. शिक्षक झाला तर 'दाल-रोटी' ची तर व्यवस्था होईलच शिवाय सन्मान मिळेल, तो वेगळाच, असे त्यांनी सांगितले आणि मी शिक्षक झालो. आपले कौतुक कोण करतो, यापेक्षा आपण कामावर संतुष्ट आहोत का, याचा शिक्षकांनी विचार केला पाहिजे. अनेक लोक चांगले काम करीत असतात आणि प्रसिद्धीपासून दूर राहतात. अशा लोकांच्या बळावर हे जग चालते आहे, असेही त्यांनी सांगितले.
आयोजकांच्या वतीने आनंद कुमार यांना 'नचिकेता सर्वोत्तम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीरू कपाई आणि मुक्ती चॅटर्जी या शिक्षणतज्ज्ञांना नचिकेता पुरस्कार देण्यात आला. या शिवाय, प्रकाश सोमलवार, आभा मेघे आणि इतरांचाही सन्मान करण्यात आला. स्मिता खनगई यांनी आनंद कुमार यांचा तर देवेंद्र दस्तुरे यांनी डॉ. भागवत यांचा परिचय करून दिला. डॉ. मृणालिनी दस्तुरे यांनी प्रास्ताविक, तर समता सचदेव यांनी संचालन केले. कार्यक्रमाला नागपूर आणि नागपूरबाहेरील शिक्षक,प्राचार्य आणि संस्थाचालक उपस्थित होते.
चांगला निकाल म्हणजे चांगली शाळा नाही!
सध्या गुणपत्रिकेवरील गुणांना अवास्तव महत्त्व आले आणि कोणती शाळा चांगली, याचा निकषही गुण व निकाल हाच झाला आहे. त्यामुळे, सगळ्याच शाळा येनकेनप्रकारेण आपला निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, हे खरे शिक्षण नाही. चांगले निकाल म्हणजे चांगली किंवा मोठी शाळा, असे होत नाही, असा टोला यावेळी सरसंघचालकांनी मारला. 'क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रात उत्तम काम करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजे. क्षमता या केवळ वर्गखोल्यातून निर्माण होत नाहीत, तर जीवनातील अनुभवांमधून मिळत असतात, असे सरसंघचालक म्हणाले. निसर्गात प्रत्येक गोष्टीचे प्रयोजन असते आणि मर्यादाही ठरली असती. ही मर्यादा शिकविणारे शिक्षण हवे. निर्भयता, जिज्ञासा, प्रामाणिकता यांच्या जोडीला ज्ञान प्राप्ती असेल तर चांगला मनुष्य घडेल. जगणे म्हणजे केवळ संघर्ष नाही तर समन्वयदेखील आहे, हे विद्यार्थ्यांना शिक्षणातून कळले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
..............................................