म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शहरातली नाटकांची चळवळ वाढावी आणि नाटकांना पोषक वातावरणनिर्मिती साधली जावी म्हणून झटणारे फार कमी कलावंत असतात. श्याम धर्माधिकारी हे केवळ रंगकर्मी नव्हते तर हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने रंगभूमीची चळवळ वाढविणारा रंगकर्मी गेल्याचा खेद नागपुरातील कलासृष्टीने गुरुवारी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि संजय भाकरे फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्तपणे गुरुवारी दिवंगत रंगकर्मी श्याम धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शंकरनगर येथील बाबुराव धनवटे सभागृह येथे ही सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी 'वनराई'चे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते.
'श्याम हे धडपडे कलावंत होते. ज्या काळात शहरात हौशी रंगभूमीवर काम करणे कठीण होते, त्या काळात शहरात व्यावसायिक रंगभूमी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शहरात सिनेमाची निर्मिती व्हावी आणि स्थानिक कलावंतांना सिनेमातही काम मिळावे म्हणून अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी सादर केलेली नाटकेही लोकप्रिय झाली. रंगकर्मी म्हणून त्यांनी अनेकांना मदत केली व या माणसांच्या मदतीने नाट्यचळवळ मोठी केली. श्यामचे निधन होणे वेदनादायी आहे,' असे गिरीश गांधी म्हणाले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर, संजय भाकरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, किशोर आयलवार, नीलेश खांडेकर, श्रीराम काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, मो. सलिम शेख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्याम धर्माधिकारी हरहुन्नरी कलावंत होते. त्यांनी आमच्यासाठी नाट्यचळवळीत केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आणि कलावंतांना समोर नेणारे आहे. त्यांचे योगदान आम्ही विसरू शकणार नाही, असे भाकरे म्हणाले. इतरही मान्यवरांनी यावेळी धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला नाट्यक्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.
----------