शेतकऱ्यांना मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान उमलत्या वयापासूनच मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांची शेतीशाळा सुरू करण्याचा प्रयोग राज्यातील काही भागांत यशस्वीरीत्या झाला आहे. याच धर्तीवर शेतकऱ्यांची विशेष शाळा भरविण्याचा विचार कृषी विभागाने केला आहे. प्रयोगशाळांमधील ज्ञान प्रत्यक्ष मातीत उतरत नसल्याची टीका सतत होत असताना शेतकऱ्यांना अधिक उत्पादन करण्यासाठी शिक्षित करणारा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग सुरू झाले आहेत. पारंपरिक पद्धतीसोबतच शेतकरी नवीन तंत्र स्वीकारू लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याचे कसब अवगत करत आहे. सेंद्रीय शेती, आधुनिक शेतीसारखे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागसुद्धा सकारात्मक दिसून येत आहे. त्यामुळे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचअंतर्गत शेतशाळा हादेखील नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. गावातील एका शेतकऱ्याच्या प्लॉटची निवड करून त्या ठिकाणी दर आठवड्याला शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान प्रसाराचे काम होते. शेतीशाळांमध्ये गावातील तीस शेतकरी सहभागी असावेत, असा नियम आहे. या शेतकऱ्यांनी गावातील इतरांपर्यंतदेखील हे तंत्रज्ञान पोचवावे, असादेखील या शेतीशाळांचा उद्देश आहे. शेतीशाळांचा हा पॅटर्न राज्यात प्रभावी ठरल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले. त्यामुळेच येत्या हंगामात कृषी आणि पूरक तंत्रज्ञान विस्ताराकरिता शेतीशाळांची मोठी मदत घेण्याच्या विचारात कृषी विभाग आहे. त्या दृष्टीने नियोजनदेखील करण्यात आले आहे. दर आठवड्याला होणाऱ्या या शेतीशाळांमध्ये शेतकऱ्यांच्या विरंगुळ्याचेदेखील काही उपक्रम राबविले जातात. त्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना चालना देण्याचेदेखील काम होते. अशाप्रकारे दुहेरी हेतू साध्य होत असल्याने शेतीशाळा प्रभावी माध्यम ठरणार आहे. ज्या भागात जे पीक आहे; त्या पिकावर आधारित शेतीशाळा घेतल्या जातील. औषधी वनस्पती असलेल्या भागात त्या पिकाची शेतीशाळा राहील.
शेतकरी होणार संघटित
शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन बरेच मजबूत होणार आहे. फार पूर्वी काही देशांमध्ये करण्यात आलेले समूहशेतीसारखे प्रयोग आता नव्याने समोर येत आहेत. उच्चशिक्षण घेऊनही शेतीकडे वळणाऱ्या युवकांचे गट तयार होत आहेत. त्याद्वारे समूह शेती करून भरघोस उत्पादन घेण्यात येत आहे. त्यामध्ये शेतीशाळासारखा प्रयोग अनुकूल ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.