नागपुरातील उत्सव एकतेचे प्रतीक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
५३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९६७मध्ये राम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्याचा विचार मांडण्यात आला. अवघ्या १५ रामभक्तांनी प्रभू रामचंद्राला पालखीत विराजमान करून ही शोभायात्रा काढली होती. त्यानंतर या उत्सवाचे स्वरूप वाढतच गेले. आता लाखो रामभक्त या शोभायात्रेत सहभागी होतात. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही या शोभायात्रेत उपस्थिती लावली होती.
यंदा करोनामुळे लॉकडाउन असल्याने रामजन्मोत्सवाची शोभायात्रा न काढण्याचा निर्णय पोद्दारेश्वर मंदिराने घेतला. यंदा शोभायात्रा नसली तरी रामभक्तांनी आपली भक्ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट केली. शोभायात्रेत सहभागी होणारे लाखो भक्त यंदा घरीच होते. नागपुरातील रामजन्मोत्सवाच्या इतिहाची पाने उलगडून बघितली असता आजच्या भव्य-दिव्य उत्सवाची परंपरा ५३ वर्षांपूर्वी सुरू झाली. गिरिजाशंकर तिवारी यांनी नागपुरात असा उत्सव व्हावा, असा विचार मांडला. रामकृष्ण पोद्दार यांनी याला मूर्तरूप दिले. तेव्हा अवघ्या १५ लोकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. आज असलेले शोभायात्रेचे भव्य रूप तेव्हा नव्हते. पूर्वी केवळ प्रवचने व्हायची, अशी आठवण रामकृष्ण पोद्दार यांनी सांगितली. रामभक्तांनी ही शोभायात्रा भव्य बनविली. साडेतीन कि.मी.च्या या शोभायात्रेत आता लाखो रामभक्त सहभागी होत असल्याचे पुनीत पोद्दार यांनी सांगितले. भोसले राजघराण्यातर्फे श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेला तीनशे वर्षांची परंपरा आहे.
प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जयघोष, मनमोहक लोकनृत्य, पौराणिक विषयांवरील आकर्षक चित्ररथ, भव्य भगव्या पताका, रांगोळ्या आणि रामभक्तांच्या भक्तिरसात चिंब भिजलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेने अवघा परिसर दुमदुमून निघतो. पौराणिक विषयांवर आधारित ५० चित्ररथ, १४ बहारदार लोकनृत्ये तसेच १०८ तरुणांचे शंखनाद पथक असे आजच्या उत्सवाचे स्वरूप आहे. शोभायात्रा मोमिनपुरा चौकासमोर जात असताना मुस्लिम बांधव यात्रेचे स्वागत करतात. फुलांचा वर्षाव करून एकतेचा संदेश देतात. शांतीचे प्रतीक कबुतरे सोडून हिंदू-मुस्लिम सौहार्दाची प्रचीती देतात.
रामभक्तांची सेवा
एप्रिल महिन्यात येणाऱ्या रामनवमीला नागपुरात ऊन चांगलीच तापायची. अनवाणी पायांची चालणाऱ्या रामभक्तांचे पाय यात पोळायचे. त्यामुळे शोभायात्रेच्या मार्गावर पाणी टाकायला सुरुवात झाली. रामप्यारे तिवारी पाण्याचा टँकर घेऊन शोभायात्रेच्या पूर्वीच निघायचे आणि तापलेला रस्ता थंड करायचे. गेली २८ वर्षे त्यांनी ही सेवा दिली, असल्याची आठवण त्यांचे पुत्र विजय तिवारी यांनी सांगितली. रामप्यारे तिवारी आता थकले आहेत. त्यामुळे रामभक्त असलेले गुलाबखान ही सेवा देतात. त्यांनाही आता ही सेवा देऊन २० वर्षे झालीत, असे तिवारी यांनी सांगितले.