म. टा. प्रतिनिधी, नागपूर
डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या रोडावते. मात्र, आता औषधोपचाराने ही संख्या वाढविता येते. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने धास्तावण्याचे कारण नाही, असा सल्ला येथे देण्यात आला.
रक्ताचे विविध विकार, रक्त कर्करोग, प्लेटलेटस आणि अन्य रक्त घटकांचा अभ्यास आणि नवीन औषधोपचार पद्धती या विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नागपूर शाखेतर्फे हेमॅटो-ऑन्को संमेलनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. प्लेटलेटची रक्तातील संख्या घट होण्यासाठी डेंग्यू-मलेरियासारखे आजार, रक्ताचा कर्करोग, आयटीपी, अप्लास्टिक अॅनिमिया आदी आजार कारणीभूत असतात, असे सांगत डॉ. रिया बल्लीकर म्हणाल्या, प्लेटलेट्स अभावी रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी प्लेटलेट्स दान कराव्यात.
लिम्फोमा आजारावरील उपचाराबद्दल डॉ. विनय बोहरा म्हणाले यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या इम्युनोथेरपी प्रभावी ठरत आहे. यातील औषधे केवळ कॅन्सरच्या पेशीला नष्ट करतात. अन्य पेशींना त्यामुळे इजा पोहचत नसल्याने औषधांचा प्रभाव चांगला होतो. डॉ. गिरीश बदरखे यांनी एचएलएच या लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या रक्तसंसर्गीत दुर्धर आजाराची माहिती दिली. या रोगावर उपचार करण्यासाठी किमोथेरपी प्रभावी ठरत असली तरी बोनमॅरो ट्रान्सप्लाण्टने या रोगाला रोखण्यात यश मिळू शकते असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये दीपंजन हलदार, डॉ. फराह जिजिना, डॉ. रिया बल्लीकर, डॉ. समीर मेलिनकेरी, डॉ. विनय बोहरा, डॉ. गिरीश बदर्खे, डॉ. अविनाश पोफळी, डॉ. गोहोकर, डॉ. ए.के. गंजू यांनीही मार्गदर्शन केले. अकादमीचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय जैन यांनी आभार मानले.