म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली
एटापल्ली तालुक्यात माओवाद्यांनी रस्ता कामावरील जेसीबीसह सुमारे तीन कोटी रुपयांची १६ वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना शनिवारी समोर आली. माओवाद्यांच्या विशेष सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून काम बंद करण्यासंदर्भात लेखी सूचना गडचिरोली पोलिसांनी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करीत कंत्राटदाराने वाहने ठेवल्याने माओवाद्यांना हिंसक घटना घडविण्यात यश मिळाल्याचे मानले जात आहे. माओवाद्यांच्या कंपनी दलमसह कसनसूर दलमच्या माओवाद्यांनी ही घटना घडविल्याचे पुढे आले आहे.
एटापल्ली तालुका माओवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. वट्टेपल्ली-गट्टेपल्ली-रेगडीदरम्यान रस्त्याचे हे काम सुरू आहे. लोकेश डोंगरवारच्या नावाने हे रस्त्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापर्यंत या ठिकाणी काम झाल्यानंतर दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टर घेऊन वाहनचालक रेगडीकडे जायला निघाले. घनदाट जंगलातून वाट दाखविण्यासाठी काही गावकऱ्यांनाही सोबत घेतले होते. पाच किलोमीटर अंतर पुढे जाताच माओवाद्यांनी या कंपनीच्या ताफ्याला अडविले. तिथे मोबाइल हिसकावून घेत काम का केले जात आहे, याबाबत धमकी देण्यात आली. त्यानंतर मजूर आणि सोबत असलेल्यांना धमकावून पेट्रोलची टाकी फोडून वाहनांना आग लावली. दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टरसह एक टिप्पर या घटनेत माओवाद्यांनी जाळले. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत या सर्वांना तिथे बसवून ठेवण्यात आले. कुणीही या घटनेची माहिती बाहेर सांगू नये या हेतुने थांबविलेल्या सर्वांची रात्री ९ वाजता सुटका करण्यात आली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी सुरू केली. माओवाद्यांची संख्या पन्नासच्या जवळपास असल्याचे वृत्त आहे. कंपनी दहा आणि कसनसूर दलमच्या माओवाद्यांनी ही घटना घडविली आहे. कंपनी दहाचा कमांडर रुपूश आणि कसनसूर दलमचा कमांडर संदीप वड्डेची घटनेच्या वेळी उपस्थिती असल्याची माहिती पुढे आली आहे.
नोटीसकडे दुर्लक्ष
माओवाद्यांचा पीपल्स गुरिल्ला आर्मी हा विशेष सप्ताह सुरू होत असल्याने माओवाद्यांकडून हिंसक घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन दुर्गम भागासह जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला होता. जाळपोळ झालेल्या रस्त्याच्या कामावरील दिवाणजीला एटापल्ली पोलिसांनी लेखी नोटीस बजावून काम बंद करून हेडरी पोलिस ठाण्यालगत किंवा इतर सुरक्षित ठिकाणी साहित्य आणि वाहने पोहचविण्याची सूचना केली होती. मात्र कंत्राटदाराने या सूचनेकडे दुर्लक्ष करीत काम सुरू ठेवले. त्यातून माओवाद्यांना हिंसक घटना घडवायची संधी मिळाली.
अतआत्मविश्वास नडला
मुख्यमंत्री सडक योजनेतून वट्टेपल्ली-गटेपल्ली रस्त्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेत अनेक वर्षे ग्रामसेवक म्हणून काम करीत असताना दुसरीकडे समांतर पद्धतीने या ग्रामसेवकाने कंत्राटदारी सुरू ठेवली होती. अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची कामे करण्याच्या आर्थिक परिस्थितीत गेलेल्या या कंत्राटदाराने गेल्या वर्षीच सेवानिवृत्ती घेतली होती. आपल्या नातेवाईकांच्या आणि काही बड्या कंपनीच्या नावाने या सरकारी सेवेत असलेल्या कंत्राटदाराने अतिसंवेदनशील भागात अनेक कामे केली आहेत. माओवाद्यांच्या दहशतीने कुणी काम करायला तयार होत नसतानाही यांनी बिनधास्तपणे कामे केल्याचीही चर्चा आहे. दुर्गम भागात केलेल्या कामाच्या आत्मविश्वासातून एटापल्लीसारख्या अतिसंवेदनशील भागात हे काम त्यांनी सुरू केल्याची माहिती आहे. त्यातून निर्माण झालेल्या अतिआत्मविश्वासानेच घात केल्याचेही सांगण्यत येत आहे.
अतिदुर्गम भागात सतर्कतेचे आदेश
माओवाद्यांनी यापूर्वी सूरजागड पहाडावर शंभर वाहने जाळली होती. त्यानंतर पोलिसांच्या अभियानामुळे माओवाद्यांना एटापल्ली तालुक्यात फारसे काही करता आलेले नाही. या वर्षात उलट माओवादविरोधी अभियानात पोलिसांनी तब्बल ५० माओवाद्यांना वर्षभरात कंठस्नान घातल्याने गडचिरोली जिल्ह्याला मिळालेल्या यशाची देशभरात चर्चा झाली होती. मात्र कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जाळपोळीची घटना घडविण्याची आयती संधी माओवाद्यांना मिळाली. या घटनेनंतर अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सतर्कतेचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक महेंद्र पंडित आणि हरी बालाजी या दोघांनीही आढावा घेतला. सोबतच गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी गडचिरोलीला भेट देऊन माओवादविरोधी अभियानासह परिस्थितीचा आढावा घेतला.